स्थलांतर-इंग्रजीत मायग्रेशन- ते खूप प्राण्यांमध्ये आढळून येतं. पक्षी, प्राणी, जलचर इतकंच काय पण एका विशिष्ट प्रजातीची फुलपाखरंही स्थलांतर करतात. मनुष्यप्राणीही स्थलांतर करतो मात्र त्याच्या आणि इतर प्राण्यांच्या स्थलांतरात खूप फरक आहे.
माणूस नोकरी व्यवसायाची जागा बदलल्यामुळे, वैवाहिक परिस्थितीमुळे, जिवाला धोका निर्माण झाल्यानं, दुष्काळी परिस्थितीमुळे, फाळणीमुळे अशा अनेक कारणांनी स्थलांतर करतो. प्राणी, पक्षी, जलचर हे अधिवासाची जागा परिस्थितीतील बदलामुळे राहावयास, खाद्य मिळण्यास किंवा प्रजनन करण्यास बिकट होते या कारणानं स्थलांतर करतात.
अलीकडे राजकीय परिस्थिती भयावह झाल्यानं स्थलांतर करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. विशेषत: आशिया आणि आफ्रिकेतील दहशतयुक्त राजवटीमध्ये जिवाला धोका असल्यानं म्हणा किंवा उपजीविकेची साधनं नाहीशी झाल्यामुळे म्हणा अनेक नागरिक युरोपात स्थलांतरित होण्याचा मार्ग स्वीकारतात. बेकायदेशीर पद्धतीनं स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात त्यांना जीवही गमवावा लागतो. काही युरोपीय देश त्यांना प्रवेश करू न देता पुन्हा परतीच्या मार्गावर ढकलून देतात. यामधला चमत्कारिक भाग असा की ज्या पाश्चिमात्य देशांनी आशियायी/आफ्रिकी देशांचं शोषण करून अराजक माजवलं तेच संकटात सापडलेल्या निरपराध माणसांना येऊ देत नाहीत.
हेच देश वर्णसाधर्म्य असलेल्या युक्रेनी स्थलांतरितांना मात्र आसरा देत आहेत. स्थलांतरितांचे अनेक प्रकार आहेत. ज्यांची घरं धार्मिक, राजकीय किंवा नैसर्गिक आपत्तींनी उद्ध्वस्त होतात ते निर्वासित. त्यांना अनेकदा छावण्यांमध्ये वर्षानुवर्षे कष्टदायक जीवन व्यतीत करावं लागतं. काही लोक नशीब आजमावण्याकरता स्थलांतर करतात. महत्त्वाकांक्षी व्यापाऱ्यांनी भारतातून इतर देशांत स्थलांतर केलं आणि आपलं मजबूत बस्तान बसवलं. हा वर्ग आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.
काहींनी मजुरीच्या शोधात वेस्ट इंडीजसारखे दूरवरचे किनारे गाठले. अनेकांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंड अमेरिकेकडे धाव घेतली आणि त्यानंतर तिथल्या सुसंधींमुळे तिकडेच संसार थाटला. भारतीयांनी आपल्या कष्टांनी आणि कर्तबगारीनं इतर देशांत यशाची शिखरं गाठली आहेत हे निर्विवाद. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या भारतीयांनी-विशेषत: हिंदू पंजाबी आणि सिंधी निर्वासितांनी-आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता सोडून भारतातील छावण्यांत आश्रय घेतला. परंतु काही वर्षांनी बहुतेकांनी आपल्या कर्तृत्वानं मोठं यश मिळवलं हे कौतुकास्पद आहे.
प्राण्यांचं स्थलांतर मानवी स्थलांतरापेक्षा खूप कष्टदायक तर असतंच पण तितकंच ते विस्मयजनकही आहे. प्राण्यांकडे नकाशा, जीपीएस प्रणाली असं काही नसूनही ते हजारो किलोमीटर्स अंतरावर कसं स्थलांतर करतात ते एक निसर्गाचं आश्चर्यच म्हणावं लागेल. त्यांची साधनं म्हणजे सूर्याचं आणि इतर ताऱ्यांचं स्थान आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र हीच आहेत. याशिवाय ते वाटेवरील महत्त्वाच्या खाणाखुणा, काही विशिष्ट गंध यांचाही वापर करतात असं आढळून आलं आहे. स्थलांतर करणारे पक्षी वातावरणातील वेगवान वाऱ्याचा उपयोग शक्ती वाचवण्याकरतात आणि देवमाशांसारखे जलचर मोठी अंतरे कापण्याकरता समुद्री प्रवाहांचा वापर करतात.
सरीसृप आणि बेडकांसारखे उभयचर प्राणीही मोठ्या अंतरांचं स्थलांतर करताना आढळून आलेले आहेत. स्थलांतरामध्ये प्राणी मानवापेक्षा जास्त “स्मार्ट’ आहेत. हमिंगबर्ड हा केवळ 7 ग्रॅम वजनाचा पक्षी 1500 किलोमीटर अंतराचं स्थलांतर करतो आणि त्यातलं 800 किलोमीटर अंतर न थांबता करतो. मॉनर्क जातीची फुलपाखरं 4800 किलोमीटर स्थलांतर करतात आणि त्यांचं आयुष्य खूप मर्यादित असल्यानं हे करताना त्यांच्या 4-5 पिढ्या खर्च होतात! नव्या पिढीला मार्गाचं ज्ञान कसं होतं ते निसर्गच जाणे!
माणसं मात्र अतिशय धोकादायक पद्धतीनं म्हणजे रेल्वेच्या टपावरून, कामचलाऊ बोटीतून, पोहत, सुरुंग पेरलेल्या सीमांवरून, सीमेवरील भिंतीवरून वा कुंपणावरून स्थलांतराचे प्रयत्न करतात. काहींनी तर गुपचूपपणे विमानाच्या खालच्या चाकांच्या कक्षात प्रवेश करून अतिउंचीवरील मरणाच्या थंडीला तोंड देत स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. मालवाहू कंटेनरमध्ये माणसांना अक्षरश: कोंबून त्यांची तस्करी करण्यात येते. अनेकदा या दिव्यातून ती माणसं जिवंतही राहत नाहीत. तरीही अव्याहतपणे मानवी स्थलांतराचे बेकायदेशीर प्रयत्न थांबण्याचं नाव घेत नाहीत. प्राण्यांचं स्थलांतर मात्र कितीही कष्टदायक असलं तरी त्यांना पासपोर्ट, व्हिसा लागत नसल्यानं त्या बाबतीत तरी ते नशीबवान आहेत, होय की नाही?
– श्रीनिवास शारंगपाणी