औरंगाबाद – कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. 15 पैकी तब्बल 12 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळविले आहे. तर भाजपला एक, शिवसेना ठाकरे गट एक आणि राष्ट्रवादीला एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. काॅंग्रेसची अत्यंत वाईट अवस्था असून त्यांच्या खात्यात एकही ग्रामपंचायत आली नाही.
शिवसेनेत सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झालेला आहे. दोन्ही गट आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यात गुंतले आहेत. दोन्ही गटांच्या नेत्यांकडून राज्यभरात कार्यकर्त्यांच्या, समर्थकांच्या भेटीगाठी घेणे सुरु आहे. दरम्यान, राज्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल गुरुवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज निकाल जाहीर झाला असून औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे.
औरंगाबाद, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर जास्त ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे.