मुंबई – शिवसेनेचे बडे नेते आमच्यासोबत आहेत. या नेत्यांचे आता जेवढे वय आहे, तेवढी वर्षे त्यांनी शिवसेनेसाठी काम केले आहे. या नेत्यांनी मोठ-मोठी आंदोलन केली आहेत. अनेकदा जेलमध्ये गेले आहेत आणि आम्ही हाडाचे शिवसैनिक असून टीका करताना जरा विचार करुन बोला, असा थेट इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिला.
दीपक केसरकर म्हणाले, शिवसेना उभी एका नेत्यामुळे झाली ही वस्तुस्थिती आहे. पण शिवसेना उभी करण्यासाठी त्या नेत्याने हाक दिली, तेव्हा असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपले जीवन समर्पीत केल्याने आज बलाढ्य अशी शिवसेना उभी राहिली आहे.
शिवसेनेचे आमदार संजय राठोड, संदीपान भूमरे आणि दादा भूसे यांनी शिवसेनेसाठी आपले आयुष्य पणाला लावले. बाळासाहेबांच्या एका आवाजावर यांनी कामे केली. या तिघांचेही मोलाचे योगदान आहे. अनेकदा जेलमध्ये गेले आहेत. संदीपान भुमरे एक वर्ष जेलमध्ये होते. त्यामुळे अशा शिवसैनिकांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता शिवसेना उभी केली असेल, तर त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणे आमच्या मनाला अतिशय लागले आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.
तुम्ही कितीही यात्रा काढा किंवा त्या यात्रांना काहीही नावे द्या. आम्ही तुमच्याबाबत कधी अनाधाराने बोललो नाही. पण शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची आहे. बाळासाहेब हे एकवचनी होते, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, ही वस्तूस्थिती आहे. पण त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाले नाही, ते शांत राहिले. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी बोलवले होते.
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मी मुख्यमंत्री पद सोडतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा.. त्यावेळी शिंदे म्हणाले होते की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत नको. तुम्ही भाजपासोबत युती करा आणि त्या युतीचे मुख्यमंत्री व्हा, असे सांगितले होते, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.