मुंबई – राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदारांचे लक्ष लागून राहिले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यानंतर विस्ताराचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 22 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे संपूर्ण जनतेचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष वेधले आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात, तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली जाईल असे समजते.
यामध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे आघाडीवर आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि अब्दुल सत्तार यांना संधी मिळू शकते.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून शिंदे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते. परंतु तीन आठवडे झाल्यानंतरही विस्तार होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला न्यायालयाचा खोडा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत सरकार पाडल्यानंतर या गटाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत एकापाठोपाठ एक चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली असून दोन्ही बाजु ऐकल्यानंतर 27 जुलैपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे हा निकालही सरकार आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.