अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांना नाहक फटका
पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात “सीबीएसई’च्या दहावी- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे अकरावी आणि पदवी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे दिसून येत आहे. सीबीएसई बोर्डाच्या निकालास दिरंगाईचा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. केवळ केंद्रीय बोर्डाचा निकाल न लागल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांना प्रवेशाविना राहावे लागत आहे.
शहरातील बहुतांश वरिष्ठ महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. अशा वेळी विद्यापीठे-महाविद्यालयांनी प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित केल्यास “सीबीएसई’चे बारावीचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे प्रवेशाची अंतिम तारीख “सीबीएसई’च्या बारावीच्या निकालानंतर निश्चित करण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतेच केले आहे. त्यामुळे सीबीएसई विद्यार्थी वगळून काही महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. काही महाविद्यालये सीबीएसई निकालानंतरच प्रवेशप्रक्रिया राबविणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीएसई दहावीचा निकाल न लागल्याने अकरावी प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली आहे. आतापर्यंत अकरावी प्रवेश पूर्ण होऊन प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू होत असतात. मात्र, विज्ञान शाखेसाठी सीबीएसई मुले सर्वात जास्त असतात. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे पुढचे नियोजन कोलमडले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला तरी अजूनही प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांना सांशकता आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
तथापि, सीबीएसई बोर्डाचा निकाल न लागल्याने सर्व प्रवेशप्रक्रिया पुढे सुरू न ठेवणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. प्रारंभी राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचा विचार करून अकरावी प्रवेश व पदवी प्रवेश सुरू राहणे आवश्यक आहे. एका बोर्डाचा निकाल न लागल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ताटकळत ठेवणे, विद्यार्थी हितावह नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. त्यातच सीबीएसई विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध होतील. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांनी जागा वाढवून मिळण्याचा प्रस्ताव सादर केल्यास, नियमानुसार पात्र महाविद्यालयांना विद्यापीठाकडून दहा टक्के प्रवेश क्षमता वाढवून मिळतो. त्यामुळे कोणत्याही बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचण येणार नाही.
डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ