जयपूर – शिवसेनेतील बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्या स्थितीला भाजपच जबाबदार असल्याची टीका कॉंग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली.
महाराष्ट्रात जे काही घडतेयं त्याची उकल वेळचं करेल. पण, महाराष्ट्रातील घडामोडी देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने चांगली लक्षणे नाहीत. भाजपने मध्यप्रदेशात घोडेबाजार केला. नंतर तसा प्रयत्न राजस्थानात झाला. आता महाराष्ट्रातही तसेच घडत आहे. जनतेने त्याची नोंद घ्यावी, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही स्वतंत्रपणे भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील सत्तारूढ महाविकास आघाडीचा भाजपने धसका घेतला आहे. त्या आघाडीपुढे 2024 मधील लोकसभा निवडणुकीत आपण तग धरू शकणार नाही अशी भीती त्या पक्षाला वाटते. त्यातून दग्याफटक्याचे राजकारण सुरू आहे. पण, जनतेला ते सहन होणार नाही. भाजपला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी छत्तिसगढमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. महाराष्ट्रातील घडामोडींमागे भाजपच असल्याचा आरोप विविध विरोधी पक्षांकडून केला जात आहे.