कोल्हापूर – सध्या शिवसेनेमध्ये जे काही चालू आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्यामध्ये भाजपचा काहीही सहभाग नाही. तसेच एकनाथ शिंदेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच शिवसेनेला सोडून गेलेला आमदारांच्या सुरक्षेचा व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. या देशात सर्वसामान्य माणसाला जे मनात येतंय ते मांडण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे लोकांना जे काही वाटते. ते बोलतात मात्र या सर्वांमध्ये भाजप कुठेही नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेशी बंड केलेले एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक आमदारांच्या परिवाराची सुरक्षा ही सरकारकडून काढून घेण्यात आली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी सरकारला पत्र लिहित खरमरीत टीका केली आहे. मात्र याबाबत आपण या सर्वापासून अनभिज्ञ आहोत, असे पाटील म्हणाले.
आपल्या घरात सध्या सर्वजण आजारी असून आपले कोणत्याही गोष्टीकडे सध्या लक्ष नाही. एकनाथ शिंदे यांनी लिहीलेल्या पत्राबाबत आपल्याला माध्यमांकडूनच समजल्याचेही ते म्हणाले.