मुंबई – महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आपली भूमिका मांडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी पक्ष शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. यापेक्षा दुसरी कोणतीही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीला गेले, त्यापैकी दोन आमदार परत आले आहेत. त्यांनी जे काही घडले ते सविस्तर सांगितले. तसेच गुवाहाटीमधील इतर आमदारांनी परत यावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी केले आहे. या राजकीय घडामोडींवर व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.