लंडन – भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नेहमी हिंदु राष्ट्रवादाचा उल्लेख केला जातो. पण त्यांच्या या शब्दात हिंदु आणि राष्ट्रवाद या दोन्हींचाही मला अभाव दिसतो आहे असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. येथील प्रख्यात केम्ब्रिज विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की मी हिंदु या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. संघ आणि भाजपच्या या घोषणेत मला हिंदु धर्माची कोणतीही भावना दिसत नाही, तसेच या शब्दात राष्ट्रवादही मला दिसत नाही. त्यामुळे आपण याला आता नवीन शब्द योजण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी हे दोघेही भारताच्या मुलभूत संरचनेचीच मोडतोड करीत आहेत. तुम्ही जेव्हा धृवीकरणाचे काम करता त्यावेळी तुम्ही संपुर्ण भारतातील जनतेचेच धृवीकरण करीत असता. ही विचारधारा भारतासाठी घातक आहे असेही ते म्हणाले.
संसद, निवडणूक आयोग अशा संस्थांनी भारतातील लोकशाहीं आणि सुसंवाद मजबूत ठेवला आहे पण हे लोक त्याच्यावरच हल्ला करीत असून तेथे लोकांना आपली मते मांडण्याची जी अनुमती असते तेथेच ते लोकांचा आवाज दाबून टाकण्याचे काम करीत आहेत असे ते म्हणाले. भारतातील जनतेला बोलू दिले पाहिजे. हे लोक मुक्तपणे बोलू शकतात तेव्हाच भारत जीवंत असतो अन्यथा त्यांचे बोलणेच बंद केले गेले तर भारत मृतवत होऊन जातो.