नवी दिल्ली – गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही भारताने इजिप्तला 61,500 टन गहू पाठवला आहे. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भारताने कोणत्याही देशाला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. इजिप्तप्रमाणेच जवळपास 12 देशांनी भारताला गहू निर्यात करण्याची विनंती केली आहे.
सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. भारताने जरी निर्यातीवर बंदी घातली असली तरी राजनैतिक पातळीवर अनेक देशांकडून भारताला गहू देण्याची विनंती केली जाते आहे. तसेच 17,160 टन गहू इजिप्तला निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बंदी लागू होण्यापूर्वीच, इजिप्तला पाठवल्या जाणाऱ्या शिपमेंटसाठी क्रेडिट हमीसह अनिवार्य औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे. मात्र अन्य देशांच्या विनंतीचे काय करणार याबाबत अद्याप वाच्यता करण्यात आलेली नाही. अमेरिका आणि अन्य काही देशांनी भारताकडे गव्हाची मागणी केली नसली तर निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, ज्या देशांना गंभीर धान्यटंचाईचा सामना करावा लागतो आहे, त्या देशांकडून आलेल्या गव्हाच्या मागणीवर भारत विचार करेल. या मागण्यांचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकारी लवकरच चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाला गव्हासाठी कोणत्या देशांकडून विनंत्या येत आहेत हे मात्र उघड करण्यात आलेले नाही.