मुंबई – देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे, महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक मोठे षडयंत्र भाजपाकडून सुरु आहे परंतु कॉंग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहील, अशा शब्दांत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोले होते. नाना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार हे सर्व आघाड्यांवर कुचकामी ठरले आहे. महागाई, शेतकरी, कामगार, गरिबांचे केंद्र सरकार प्रश्न मोदी सरकार सोडवू शकले नाही. कॉंग्रेस पक्षाला आजच्या परिस्थितीची चिंता वाटते म्हणून जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी आमची लढाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्याचे निर्णय घेतले पाहिजेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. हिंदू धर्माबद्दल आम्हाला दुसऱ्यांकडून शिकण्याची गरज नाही. माणुसकी हा खरा धर्म असून ती जोपासली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगाविला. जनतेचे प्रश्नच सोडवणार नसले तर ते सरकार काय कामाचे? कॉंग्रेस पक्षाने सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर संघर्ष केला आहे. आजही आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारविरोधात उभे आहोत, असेही पटोले म्हणाले.
केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय
देशाच्या तिजोरात सर्वात जास्त पैसा मुंबई, महाराष्ट्रातून जातो पण केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देताना मात्र हात आखडता घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. केंद्र सरकारनेच इंधनावरील करातून 26 लाख कोटी रुपये कमावले आहेत आणि राज्य सरकारने कर कमी करावेत अशी अपेक्षा केंद्र सरकार व भाजप करत आहे हे अत्यंत चुकीचे आहे, असेही नाना पटोले म्हणाले.