दिब्रुगड – आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून परिस्थिती आणखीनच बिकट झाली. या पुराचा फटका राज्यातील 27 जिल्हे आणि सुमारे 7.18 लाख नागरिकांना फटका बसला आहे. तसेच आतापर्यत एकूण 9 जणांचा बळी गेला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. तर कामपूरमध्येही दोन जण बेपत्ता झाले आहेत.
यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9च्यावर पोहचली आहे. या पुरामुळे राज्यात 7,17,500 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कचार, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, दिमा हासाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजाई, कामरूप, कामरूप महानगर, कार्बी आंगलॉंग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगावं, नागांव, नलबाडी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
नागांवमध्ये सर्वाधिक 3.31 लाख लोक बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ कचार (1.6 लाख) आणि होजाली (97,300) यांचा क्रमांक लागतो. सध्या 1790 गावे पाण्याखील गेली आहेत. तर संपूर्ण राज्यात 63,970.62 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 359 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत, जिथे 80,298 लोकांना मदत केली जात असून यामध्ये 12,855 मुलांचा समावेश आहे.
दरम्यान आसाममध्ये आता लष्कर, निमलष्करी दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि स्थानिक लोकांनी बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर करून 7,334 लोकांना विविध पूरग्रस्त भागातून बाहेर काढले आहे.