मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर त्यांच्याच मशिदीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा कार्यकर्त्यांना आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवर राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारण औरंगाबादच्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण करणारे भाषण केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा काल सायंकाळी पत्रकाद्वारे जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख करत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
यासाठी चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी “हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे.
तसेच अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, “बेकायदा भोंग्याच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल,” असेही म्हटले.