मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात पहाटेपासूनच आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे दिसत आहे. आज पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आले. तर दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीपासूनच राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
ठाण्यात मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनिटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केले. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.
काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.