सातारा – किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत 69.31 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून विद्यमान अध्यक्ष मदन भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सभासद कोणाच्या बाजूने कौल देणार हे गुरुवारी (दि. 5) स्पष्ट होणार असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेल व आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल यांच्यात लढत झाली. या निवडणुकीच्या प्रचारात कोरेगावचे आमदार महेश शिंदे व आ. शशिकांत शिंदे यांनी सक्रिय भाग घेतल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही भूमिका निर्णायक राहणार आहे. वाई, खंडाळा, जावळी, सातारा, कोरेगाव अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याचे 51 हजार 716 ऊस उत्पादक व 374 संस्था सभासद असे एकूण 52 हजार 90 मतदार आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून वाई (65), जावळी (10), खंडाळा (13), सातारा (28), कोरेगाव (37) व महाबळेश्वर (1) अशा 154 मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली. मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसत होता.
उमेदवार असलेल्या गावांतील कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. प्रत्येक मतदारास ऊस उत्पादक सभासद मतदारसंघासाठीच्या पाच व महिला, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती जमाती वर्ग, अनुसूचित जाती जमाती या राखीव मतदारसंघासाठीच्या अशा नऊ मतपत्रिका देण्यात येत होत्या. चार वाजेपर्यंत 62.84 टक्के मतदान झाले. यावेळी 32 हजार 432 व्यक्तिगत व 301 संस्था मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. अक्षय तृतीया सणामुळे सकाळी संथ गतीने मतदान सुरू होते. कोठेही रांगा दिसत नव्हत्या. दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाचा जोर कमी होता. अखेरच्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला.
मतदान संपेपर्यंत व्यक्ती मतदारसंघासाठी 35 हजार 771 तर सोसायटीमधून 331 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 69.31 टक्के मतदान झाले. भुईज (70 टक्के), कवठे (77), बावधन (78), वाईत सिद्धनाथवाडीत (78.99), द्रविड हायस्कूल केंद्रावर ( 78), रविवार पेठ (65 टक्के) मतदान झाले. यावेळी किरकोळ वाद वगळता कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. वाई औद्योगिक वसाहतीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात गुरूवारी (दि. 5) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी व सहाय्यक निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक गणपत खामकर यांनी दिली. पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.