नगर -मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासंदर्भात दिलेल्या अल्टीमेटमवरून पोलीस सर्तक झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजाविल्या आहेत. याचे उल्लंघन केल्यास ताब्यात घेतले जाणार आहे. याशिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी पर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. भोंगे न उतरविल्यास 4 मे पासून मशिदीपुढे हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. नगर शहरात यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत.
शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजाविल्या आहेत. शहरातील सामाजिक व धार्मिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. वेळोवेळी याचा आढावा घेतला जाणार आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.