जेजुरी- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी शहरात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने चारचाकी वाहनाची संख्या देखील वाढत आहे. सुट्टीच्या दिवशी व शनिवार, रविवार व यात्रेच्या दिवशी जेजुरी शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होते. जेजुरीतून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी मार्ग व मोरगाव रस्त्यावर दररोज दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागत असतात. हो कोंडी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जेजुरी शहरातून बाह्यवळण रस्ता अथवा उड्डाण पूल व्हावा अशा आशयाचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना दिले, असल्याची माहिती जेजुरी पालिकेचे विरोधीपक्षनेते जयदीप बारभाई यांनी दिली.
जेजुरी शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे या रस्त्यावरील व्यवसाय धंदे बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. रोजच होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच भर म्हणून आळंदी पंढरपूर महामार्ग जेजुरी शहरातून आत आहे. यामध्ये रस्त्याच्या दक्षिणेकडील एकाच बाजूने मोठ्या प्रमाणात जागा घेणार असल्याचे दर्शविले आहे. या अन्यायकारक सर्वेक्षणास नागरिकांनी विरोध केला असून महामार्गाच्या आराखड्यास रस्त्याच्या उत्तरेकडील नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. दक्षिणेकडील काही नागरिकांच्या इमराती या नियमबाह्य असूनही त्यांना संरक्षण दिले जाते अशी चर्चा आहे.
सध्याची वाहतुकीची कोंडी व भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या यांचा विचार करता जेजुरी शहरासाठी बाह्यवळण रस्ता अथवा उड्डाणपूल होणे नितांत गरजेचे आहे. बाह्यवळण झाल्यास अवजड वाहने थेट शहरा बाहेर जातील ज्यांना देवदर्शनासाठी यायचे आहे तेवढीच वाहने जेजुरीत येतील. जयदीप बारभाई यांनी प्रस्तावित महामार्गामुळे नागरिकांवर होणाऱ्या अन्याया बाबत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून चर्चा करून निवेदन दिले होते. या निवेदनानुसार खासदार सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना पत्र
दिले आहे.