मुंबई – चेन्नई सुपर किंग्सनं या सिझनमधील सर्व चार सामने गमावले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सीएसकेची ही सर्वात खराब सुरूवात आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादनं सीएसकेचा 8 विकेट्सनं पराभव केला. या पराभवाला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यावर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अत्यंत सुमार होत आहे. पण यासाठी खेळाडूंना नव्हे तर संघ मालक व व्यवस्थापनालाच जबाबदार धरले गेले पाहिजे, अशा शब्दांत माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी टीका केली आहे.
जर यंदाच्या मोसमापूर्वी महेंद्रसिंह धोनी चेन्नईचे नेतृत्व सोडणार होता याची माहिती होती, तर फाफ डुप्लेसीला संघातून लिलावासाठी मुक्त का केले गेले. तो चेन्नईकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत होता. तो बाहेर पडल्यामुळे संघात एका भक्कम सलामीवीर फलंदाजांची उणीव सातत्याने जाणवत आहे, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.
चेन्नई टीम मॅनेजमेंटचा महेंद्रसिंह धोनीच्या जागी नवा कर्णधार करण्याचा विचार सुरू होता तर त्यांनी फाफ ड्यू प्लेसिसला मुक्त करण्याची गरज नव्हती. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून फाफ हा चांगला पर्याय होता. तो कर्णधार झाला असता तर त्याच्या नेतृत्वाखाली रविंद्र जडेजा किंवा धोनीच्या जागी होणारा सीएसकेचा अन्य कोणताही कर्णधार अधिक मोकळेपणे खेळू शकला असता, ‘असं परखड मत देखील शास्त्रींनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, सध्या फाफ डू प्लेसिस यंदाच्या हंगामात बंगळुरूच्या संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बंगळुरूनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी बंगळुरूनं तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर सीएसकेचा संघ 4 पराभवानंतर सर्वात तळाशी आहे.