नगर – शहरात सध्या पिण्याच्या पाण्याबरोबरच विजेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात तीन ते चार तास वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी सुद्धा महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. महावितरणाच्या या कारभारावर संतप्त होत भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांनी गुरुवारी महावितरण कार्यालयात तोडफोड केली.
काही दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने विजेचे भारनियमन सुरू केले आहे. या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत नागरिक लोकप्रतिनिधींना फोन करतात. माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन करतात मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे संतप्त झालेले केडगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी गुरुवारी रात्री केडगाव येथील महावितरण कार्यालय गाठले. महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी फोन का उचलत नाहीत. लोकप्रतिनिधींना जनतेला त्रासाला सामोरे जावे लागते, असा जाब महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारत त्यांनी कार्यालयात टेबल आणि खुर्च्यांची तोडफोड केली. महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, असेही त्यांनी सांगितले.