सातारा – सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याला शुक्रवारी झोडपून काढले. शिरंबे, ता. कोरेगाव येथे वीज पडल्याने उसाचा फड जळाला. कराड शहर व तालुक्यात जोरदार पाऊस व वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडून जाऊन काही वाहनांवर पडल्याचे वृत्त आहे. सातारा शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागात पुसेगाव, औंध भागात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लढती मुसळधार पावसामुळे स्थगित करण्याची वेळ आली.
वादळी पावसाचा कराड शहर व तालुक्याला जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले. वाहनांचे मोठे नुकसान झाल आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. कृष्णा पुलावर पाणी साचून काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा शहराला पावसाचा फटका बसला. बाजारपेठेत व्यावसायिक, किरकोळ विक्रेते नागरिकांची चांगलीच पळापळ उडाली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले होते. तब्बल दीड तास पाऊस कोसळत होता. जिल्ह्याच्या पूर्व भागात पुसेगाव, वडूज, औंध येथे दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावली.
पूर्व भागातील इतर ठिकाणीही पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष कोसळल्याचे वृत्त आहे. शिरंबे, ता. कोरेगाव येथे वीज कोसळून उसाचा फड पेटला. सातारा शहर आणि तालुक्यात सायंकाळी 5 नंतर जोरदार पाऊस झाला. साताऱ्यातील दौलतनगरात काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने वीजवाहक तारांवर ताण पडला.
त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. साताऱ्यात पावसाने दीड तास धुमाकूळ घातला. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. शहराच्या अनेक भागातील वीज सुमारे पावणेदोन तास गायब होती. या पावसाने बळीराजाचे फारसे नुकसान झाले नसले, तरी आंब्याला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून हापूस आंब्याची आवक एप्रिलमध्ये सुरू होते; परंतु पश्चिम किनारपट्टीकडून येणारे जोरदार वारे आणि पावसामुळे हापूसचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. पुढील दोन दिवस हवामान ढगाळ राहील. पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.