वानवडी – पुणे-सोलापूर महामार्गावर फातीमानगर येथील पुलावर थांबून स्थानिक नागरिकांसह वाहनचालक भैरोबानाल्यात कचरा टाकत असल्या कारणाने संरक्षित जाळी लावण्यात आली आहे. परंतु, बरेच नागरिक तसेच वाहनचालक कठड्यावर थांबून या जाळीवरून कचरा टाकण्याचा प्रयत्न करतात. तसेच, ही जाळी फुकटात जाहिरातबाजी करणाऱ्यांसाठी हक्काची जागा बनली आहे. त्यातच या ठिकाणचे चेंबर सातत्याने फुटत असल्याने सकाळच्या वेळी तेथून सांडपाणी वाहते परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहराच्या पूर्वेकडील भागात भैरोबानाला हा मोठा ओढा असून वानवडी ते पुढे कोरेगाव पार्क जवळपास 7 ते 8 कि.मी.पर्यंत तो वाहतो. पुणे कॅन्टोन्मेंट लष्कर विभाग व महापालिकेच्या हद्दीवर हा ओढा असल्याने येथील समस्या कोणी सोडवायची याबाबत नेहमीच प्रश्न निर्माण होत असतो. यातूनच या ओढ्या संदर्भातील प्रश्न कित्येक महिने सुटत नाहीत. महापालिकेवर सध्या प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातच कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे येथील समस्येबाबत कोण तक्रार करणार? त्यामुळे गेली कित्येक दिवस सदर समस्या सुटलेली नाही. या ठिकाणी नागरी वस्ती मोठी असल्याने येथील नागरिकांसह महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर समस्या दोन्ही पैकी एका प्रशासनाने सोडवावी, अशी मागणी होत आहे.
ओढ्याच्या प्रवाहात कचऱ्याचा अडथळा…
पुणे महानगरपालिकेकडून ओढा साफ करण्यात आल्याचा दावा नेहमीच दरवर्षी केला जातो तर पुणे कॅन्टोन्मेंट लष्कर विभागाकडून ओढा कधीही साफ केला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या दोन प्रशासनाच्या समन्वयाअभावी ओढ्यालगतचा कचरा वाढत जातो. या कचऱ्यामध्ये थर्माकोल, प्लॅस्टिक, पालापाचोळा याचे प्रमाण मोठे असल्याने औढ्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असतो. यातून दुर्गंधीही पसरत असते. पावसाळ्यापूर्वी ओढ्यालगतचा कचरा उलणे गरजेचे ठरत आहे.