रत्नागिरी : शासनाने महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनाचे मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले असून, या शासनाच्या माध्यमातून कोकणाचा शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार अशी ग्वाही पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे परिवहन संसदीय कार्य मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पर्यटन, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दापोलीत होणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणचा समारंभ जणू एखाद्या सणासारखा साजरा होत असताना पाहून आनंद व्यक्त करून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड किल्ल्यासाठी 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर कोकणातील सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्याची भूमिका महा विकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून, समितीच्या माध्यमातून किल्ले संवर्धनाचे काम केले जात आहे.
किल्ले संवर्धनासाठी वेळप्रसंगी दिल्लीकडे पाठपुरावा करावा लागेल तो सुद्धा करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत किल्ले संवर्धनाचे काम थांबणार नाही. कोकणातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोकणात रोजगार निर्मिती कशी होईल यादृष्टीने पाठपुरावा केला जात आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे बांधकाम स्थानिक माती व स्थानिक जांभा या दगडाने केले असल्याने त्याचे स्वरूप आणि महत्त्व वाढले आहे. पुतळ्याचे बांधकाम राजांना शोभेल असे करण्यात आले आहे. असे सांगून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे कौतुकही केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब म्हणाले की, शासनाने कोकणासाठी कधीच निधी कमी पडू दिला नाही. कोकणाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केला.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, छत्रपती शिवरायांच्या विचारांना साजेशे काम या शासनामार्फत होत आहे. कोकणातील गड- किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम प्रगतीपथावर चालू आहे. पंधरा ते वीस गड-किल्ल्यांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोकणातील स्थानिक जनतेला न्याय देण्यासाठी कोकण विभागातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.