– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमापासून महाराष्ट्रातील मराठी क्रिकेटप्रेमींसाठी स्टार परिवाराने एक सुखद धक्का दिला. यंदापासून आयपीएलच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनही सुरू झाले. फक्त अपेक्षा इतकीच आहे की, मराठीतून समालोचन करणारे केवळ मराठी चांगली बोलता येते म्हणून नियुक्त केले जाऊ नयेत तर त्यांचा क्रिकेटचा अभ्यासही असावा तरच समालोचनही अभ्यासू होईल.
क्रिकेटमध्ये समालोचनाचा प्रारंभ झाल्यावर ते इंग्रजीतच होत होते. कालांतराने त्यात थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या राष्ट्रभाषा हिंदीतही समालोचन सुरू झाले. जे भारतीय क्रिकेटपटू इंग्रजीतून समालोचन करतात त्यातीलच काही खेळाडू हिंदीतही समालोचन करतात. मात्र, विक्रमादित्य सुनील गावसकर, रवी शास्त्री, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मोहिंदर अमरनाथ यांच्यासारखे खेळाडू जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा असे वाटते की त्यांच्यावर जबरदस्ती झाली असावी. एकतर महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यांचे खेळाडू हिंदी बोलताना ऐकताना काहीतरी वेगळे ऐकायला मिळते व त्यांची हिंदी ऐकून आपण आपली हिंदी विसरू की काय, अच्छी बोलिंग करी है, किंवा काल शास्त्री व कांबळी बोलत होते ते ऐकताना परदेशी व्यक्तीकडून मराठी ऐकत आहोत असा भास होत होता.
एकतर संदीप पाटील, विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, स्नेहल प्रधान यांच्यासह कुणाल दाते, प्रसन्न संत व चैतन्य संत असे पथक मराठीतील समालोचनासाठी तयार केले गेले आहे. यातील कुणाल, प्रसन्न व चैतन्य बोलत चांगले होते, पण त्यांचा क्रिकेट समजावून सांगण्याचा अभ्यास एखाद्या शाळकरी मुलासाऱखा वाटत होता.
मुजुमदार, कांबळी व पाटील मराठीतून बोलतात हेच त्यांच्या या पथकातील नियुक्तीचे एकमेव कारण असावे. या समालोचनात सामन्यातील खेळाडूची बलस्थाने तसेच त्यांचे कमकुवत दुवे याची माहितीही दिली गेली पाहीजे. तसेच कोणता खेळाडू कसा बाद झाला किंवा त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या कोणत्या चुकांचा फायदा उठवला हे देखील सांगावे तरच सामना पाहत असलेल्या प्रेक्षकांना त्याची माहिती होईल.
मुळात या लोकांना इतर कुठेही मराठीतून बोलताना पाहिले गेले नाही. एखाद्या पत्रकार परिषदेत किंवा स्वतःच्या घरातही हे मराठीतून बोलत नाहीत आता केवळ मराठी समालोचनाच्या पथकात समावेश झाल्यामुळे त्यांच्याकडून मराठी प्रेम दाखवले जात आहे हे स्पष्ट दिसून येते. महाराष्ट्रातील क्रिकेटचे जाणकार, अभ्यासक व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे एकेकाळचे अध्यक्ष बाळ ज. पंडित यांनी क्रिकेटला मराठी स्वरूप दिले आता असेच कोणी पुढे यावे व त्याने समालोचनालाही मराठी भाषेच्या समृद्धीचे कोंदण द्यावे हीच अपेक्षा.