नवी दिल्ली – पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, या लोकांना धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडायची आहे. या लोकांचे कारस्थान देश तोडण्याचे आहे. यांना देशात धर्माच्या नावावर भडकावून अनेक पाकिस्तान निर्माण करायचे आहेत. हे लोक देशाला दुस-या फाळणीकडे घेऊन जात आहेत, असे मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपचे नाव न घेता म्हटले. काल आरएसपुरा येथे एका मेळाव्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
मेहबुबा म्हणाल्या, “मोहम्मद अली जिना यांनी इतिहासात या देशाची फाळणी केली, परंतु आज पुन्हा एकदा जातीय आधारावर देशाची फाळणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लोकांना (भाजप) आणखी एक विभाजन हवे आहे.
मुफ्ती म्हणाल्या की, महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने केली आणि आज गोडसेचे शेकडो हजारो अनुयायी त्यांच्या विचारसरणीचे पालन करत आहेत. लोकांना भाजप आणि इतर फॅसिस्ट शक्तींच्या विरूद्ध एकत्र लढावे लागेल.
त्या पुढे म्हणाल्या की, ‘आम्ही ही धार्मिक फाळणी होऊ दिली तर भगतसिंगांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाईल. त्यामुळे गांधींना पुन्हा मरू देऊ नका. आमचा पक्ष गांधीवादी विचारधारा मरू देणार नाही.” मेहबुबा यांनी दावा केला की भाजपला काश्मीरमध्ये जागा मिळणार नाही. त्यांनी असाही दावा केला की केवळ भाड्याने घेतलेले एजंटच तेथे पक्षाचा झेंडा उंचावत आहेत, जम्मूमध्ये जातीयवादी शक्तींशी लढण्यासाठी उभे राहणे गरजेचे आहे. यासोबतच मेहबुबा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ‘धर्मनिरपेक्षते’मधील विश्वासार्हतेबद्दल आणि भारताला विकास आणि समृद्धीच्या मार्गावर नेल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.