ममता बॅनर्जी निवडणूक आयोगावर संतापल्या
कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये इयत्ता 12वी च्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान आसनसोल लोकसभा मतदारसंघ आणि बालीगंगे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार आगपाखड केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, या निवडणुकांमुळे परिक्षांच्या तारखा बदलाव्या लागल्या आहेत त्याबद्दल मी विद्यार्थ्यांची माफी मागते. त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आणि पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करताना राज्य बोर्डाच्या परीक्षांचा विचार न केल्याचा आरोपही केला.12 एप्रिल रोजी ही पोटनिवडणूक होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार असल्याने 6 ते 15 एप्रिलपर्यंत तेथे कोणतीही परीक्षा होणार नाही.
ममतांनी म्हटले आहे की निवडणूक आयोग पोटनिवडणुकांना महत्त्व देत नाही आणि भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे. पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे केंद्रीय दले लवकरच येण्यास सुरुवात होईल आणि ते अनेक शाळांच्या इमारतींमध्ये मुक्काम ठोकतील. जेथे मतदान केंद्रेही उभारली जातील.
त्यामुळे, आम्हाला परिक्षांच्या तारखांची पुनर्रचना करावी लागेल.त्याबद्दल मी विद्यार्थी आणि पालकांचीही माफी मागते असेही ममतांनी म्हटले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांसोबत या दोन जागांसाठी पोटनिवडणूक का घेण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला.