मुंबई : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच . यावेळी त्यांनी “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश ज्या पद्धतीने पुढे जातोय, त्यावरून देशातील शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार देशाला प्रगतीच्या वेगळ्या सोपानावर घेऊन जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवर संताप व्यक्त केला.
किरीट सोमय्यांना नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, की “या सरकारचं डोकं फिरलंय. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर सर्वांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारामध्ये कुठल्याही ऑफिसमध्ये रितसर जाऊन तपासणी करण्याचा अधिकार कुठल्याही सामान्य नागरिकाला आहे. तोच अधिकार बजावण्यासाठी किरीट सोमय्या गेले होते.
कागदपत्रांची पडताळणी करताना खुर्चीवर बसणं हा देखील अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे, कोणाच्या बापाच्या मालकीचे ऑफिस नाही, मी जाणीवपूर्वक कोणाच्या बापाच्या मालकीचे ऑफिस नाही, हे शब्द वापरत आहे, कारण ज्या प्रकारे नोटीसा दिल्या जात आहेत, जणूकाही खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे मी हे शब्द वापरत आहे.”
“किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कोणत्या अधिकारातून तुम्ही नोटीस पाठवली असा सवाल त्यांनी केला. जे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे, ते नेमकं कोणी काढलं हे रेकॉर्ड झाले आहे. ज्यांनी हा फोटो काढला तेच तक्रारदार आहेत, ही सर्व मिलीभगत आहे, चोरी करायची आणि कोणी उघड करायचा प्रयत्न केला तर, त्याला बदनाम करायचं हे खपवून घेतलं जाणार नाही,” असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.