सेंच्युरीयन – भारतीय संघाने गुरुवारी यजमान दक्षिण आफ्रिकेचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 113 धावांनी पराभव केला व 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत द्विशतकी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताच्या जसप्रीत बुमराह, महमद शमी, महंमद सिराज आणि रवीचंद्रन अश्विन यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर हा विजय साकार झाला. पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल सामनावीर ठरला.
भारताने विजयासाठी दिलेल्या 305 धावांच्या आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर, टेंबा बवुमा यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकून राहता आले नाही. त्यांचा डाव 191 धावांवर संपूष्टात आणत भारतीय संघाने 113 धावांनी विजय प्राप्त केला.
गुरुवारी पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 4 बाद 94 वरून पुढे सुरू झाल्यावर चहापानापूर्वीच त्यांचा डावही संपला. कर्णधार डीन एल्गरने 77, बवुमाने 35, क्वांटन डीकॉकने 21 व किगन पीटरसनने 17 धावा केल्या. बाकी खेळात भारताच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखले. एल्गरने 156 चेंडूत 12 चौकारांसह 77 धावा केल्या.
बवुमाने पहिल्या डावात 52 धावांची खेळी केली होती. हीच दोन अर्धशतके दोन्ही डावांत मिळून दक्षिण आफ्रिकेकडून नोंदली गेली. या कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 327 धावा केल्या. त्यात राहुलचे शतक तर, मयंक आग्रवालचे अर्धशतक होते. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांवर संपला होता. त्यात बवुमाच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता.
भारताचा दुसरा डाव 174 धावावंर संपला होता. मात्र, पहिल्या डावातील आघाडीचे 130 धावांचे भक्कम पाठबळ असल्याने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 305 धावांचे आव्हान निर्माण झाले. त्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव 191 धावांवर संपला. भारताकडून जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. महंमद सिराज व रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 327. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 197. भारत दुसरा डाव – 174. दक्षिण आफ्रिका दुसरा डाव – 68 षटकांत सर्वबाद 191 धावा. (डीन एल्गार 77, टेंबा बवुमा 35, क्वांटन डीकॉक 21, जसप्रीत बुमराह 3-50, महंमद शमी 3-63, रवीचंद्रन अश्विन 2-18, महंमद सिराज 2-47).
आशिया खंडाबाहेरचा यंदाचा चौथा विजय
भारतीय संघाने यंदाच्या मोसमात 2018 सालानंतर पुन्हा एकदा आशिया खंडाबाहेर एकाच वर्षात चार कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम साकार केला. यंदा भारताने ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनला, इंग्लंडविरुद्ध लॉर्डस व ओव्हलला तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरीयनला विजय मिळवला.
प्रतिस्पर्धी संघांची मक्तेदारी संपवणारा संघ
भारतीय संघाने कसोटी व एकदिवसीय सामन्यांत 1980 सालापासून परदेशी संघांची मक्तेदारी संपूष्टात आणली आहे. या कसोटीतही हेच घडले. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने मिळवलेला विजय हा त्याच धर्तीचा होता. यापूर्वी 1975 व 1979 साली वेस्ट इंडिजने एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा सलग दोनवेळा जिंकली होती मात्र, 1983 साली वेस्ट इंडिजची मक्तेदारी मोडून भारतीय संघ विश्वविजेता बनला. स्टिव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सलग 16 कसोटी सामने जिंकले होते. ही विक्रमी वाटचालही भारतीय संघानेच संपूष्टात आणताना त्यांना कोलकाता कसोटीत नमवले. आता भारतीय संघ उरलेल्या दोन कसोटीत किमान एक विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी होणार का याची उत्कंठा लागून राहिली आहे.