नवी दिल्ली : बिहारमधील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कारण विभागाच्या करोना तपासणी यादीवर नजर टाकल्यास या कारभाराचा खरा चेहरा समोर येईल. या यादीमध्ये स्वॅब तपासणीसाठी दिलेल्या लोकांमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी इतकच काय तर अभिनेत्री प्रियंका गांधी आणि अभिनेता अक्षय कुमार यांची नावे असल्याचे समोर आले आहे. करोना चाचणी अरवाल जिल्ह्यामध्ये झाली असल्याचे समोर आले आहे.
खोट्या करोना चाचण्यांचा भांडाफोड बिहारमधील अरवाल जिल्ह्यात झाला आहे. या प्रकरणामध्ये खोटी नावे नोंदवून करोना चाचण्या करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाच्या यादीत देशातील बड्या नेत्यांबरोबरच सिनेसृष्टीमधील बड्या व्यक्तींची नावंही आरटी-पीसीआर चाचण्यांच्या यादीमध्ये आहे. २७ ऑक्टोबर रोजी अरवाल जिल्ह्यातील कारपी ब्लॉकमध्ये या चाचण्या करण्यात आल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे ज्या प्रसिद्ध व्यक्तींची नावे या यादीमध्ये आहेत ते बिहारचे नाहीत. तसेच ते कधी बिहारमध्ये वास्तव्यासही नव्हते. तरीही वेगवेगळ्या गावांमधील पत्ते या प्रसिद्ध नावांसमोर लिहिण्यात आले आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव या यादीमध्ये तिनदा आलं आहे. काँग्रेसचे बिहारमधील माजी पक्षप्रमुख राम जतन सिंन्हा यांच्या पूर्णा गावातील पत्ता मोदींच्या नावापुढे लिहिलेला आहे. तसेच प्रियंका चोप्रा हे नाव यादीमध्ये सहावेला आलं असून कारपी ब्लॉकमधील जोनहा गावाचा पत्ता तिच्या नावापुढे आहे.
अक्षय कुमारचे नाव चार वेळा तर अमित शाह यांच्या नावाचा उल्लेख या यादीमध्ये दोनदा करण्यात आला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार या नावाच्या व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल २७ ऑक्टोबर रोजी पुढील दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबरला आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी कलेक्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. या चाचण्यांमध्ये कोणालाच करोना संसर्ग झालेला नसल्याचेही या यादीत दाखवण्यात आले आहे.
राज्येचे आरोग्य निर्देशक संजय कुमार सिंह यांनी दोन डेटा ऑप्रेटर्सला कामावरुन काढून टाकण्यात आलं असून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना दिली. हा फसवणुकीचा प्रकार असून या नावांच्या आडून कोणाचे सॅम्पल गोळा करण्यात आलेले याचा तपास केला जाईल असं संजय यांनी म्हटलं आहे. डेटा ऑप्रेटर्सने या प्रकरणामध्ये आमच्यावर वरुन दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केलाय. मात्र वरिष्ठांनी हे आरोप फेटाळले आहेत.
अशाप्रकारे बिहारमध्ये पहिल्यांदाच करोना चाचण्यांची खोटी नोंद झालेली नाही. यापूर्वी फेब्रुवारी माहिन्यामध्ये जामुईमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.