मुंबई, – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका यापुढे कॉंग्रेस आता स्वबळावर लढणार आहे, असे निर्देश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा दिले आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेस स्थानिक पातळीवर कोणतीही तडजोड न करता या निवडणुका स्वबळावर लढणार आहे.
याबाबत कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना पत्र पाठवले आहे. त्यात पक्षाची भूमिका नमूद करण्यात आली आहे.
आगामी काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींच्या दृष्टीकोनाने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका कॉंग्रेस पक्षाने कुठलीही तडजोड न करता स्वबळावर लढविण्याच्यादृष्टीने आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन आढावा घ्यावा.
तसेच यासंदर्भात नियोजन करुन आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांपुढे सादर करावा. तसेच आपल्या जिल्ह्यातील गठीत केलेल्या बुथ कमिट्यांची संपूर्ण तपशिलवार अद्यावत माहिती प्रदेशाध्यक्षांपुढे सादर करावी, असे आदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.