लखनौ – महाराष्ट्राने फलंदाजी व गोलंदाजीत अफलातून कामगिरी करताना सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी पद्दुचेरी संघाचा 117 धावांनी पराभव केला. या विजयासह महाराष्ट्रने या स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला असून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान जवळपास निश्चित केले आहे.
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, डावाची सुरुवात केल्यावर ऋतुराजच अवघ्या 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र, यश नहार व नौशाद शेख यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली.
अर्धशतकाजवळ आलेला यश 44 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 23 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार 3 षटकार फटकावले. दरम्यान, नौशादने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने केदार जाधवसह संघाचे शतक फलकावर लावले. नौशाद अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने 36 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार फटकावताना 55 धावांची खेळी केली.
केदारनेही नाबाद अर्धशतक फटकावले. त्याने 52 धावांच्या खेळीत 39 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार फटकावले, त्याला सुरेख साथ देत अझीम काझीने नाबाद 31 धावा करताना 17 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले.
पद्दुचेरीकडून रघू शर्माने 2 गडी बाद केले. महाराष्ट्राने विजयासाठी दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पद्दुचेरीच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. महाराष्ट्राच्या नौशाद शेख, अझीम काझी, अक्षय पालकर व सत्यजित बच्छाव यांच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव अवघ्या 76 धावांवर संपला.
संक्षिप्त धावफलक –
महाराष्ट्र – 20 षटकांत 3 बाद 193 धावा. (यश नहार 44, नौशाद शेख 55, केदार जाधव नाबाद 52, अझीम काझी नाबाद 31, रघू शर्मा 2-34). पद्दुचेरी – 13.5 षटकांत सर्वबाद 76 धावा. (दामोदरन रोहित 16, नौशाद शेख 3-9, अझीम काझी 3-18, अक्षय पालकर 2-6, सत्यजीत बच्छाव 2-12).