ईशान्येकडील तिन्ही राज्यांमधील विजय एकट्या भाजपचा नसून मित्र पक्षांचा आहे. त्रिपुरात जागा घटल्या आहेत. नागालॅंडमध्ये एकही जागा वाढली नाही आणि मेघालयात फक्त दोन जागांवर विजय मिळाला. यामुळे, सत्ताधारी पक्षासाठी हा विजय सतर्कतेचा इशारासुद्धा आहे.
ईशान्येकडील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तिन्ही राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आघाडीने मुसंडी मारत झेंडा फडकविला आहे. भाजपचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आणि हा विजय आपल्यामुळेच मिळाला असं काहीसं चित्र रंगविण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र, यास एक अपूर्ण सत्य म्हणावं लागेल. निवडणुकीच्या निकालावर बारकाईने नजर टाकली तर ही बाब सहज लक्षात येईल की हा विजय भाजपला सतर्कतेचा इशारा देणारा आहे. त्रिपुरा, नागालॅंड आणि मिझोरम या तिन्ही राज्यांतील 180 जागांसाठी मतदान झाले होते. यातील फक्त 71 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे.
भाजपने 2018 मध्ये तीन दशकांचे माणिक सरकार यांच्या नेतृत्वातील डाव्यांचे सरकार उलथवून आपले सरकार स्थापन केले होते. त्यावेळी भाजपला 36 जागांवर विजय मिळाला होता. त्या यशाचं श्रेय राष्ट्रीय सचिव सुनील देवधर या मराठी माणसाला जातं. मात्र, नुकताच लागलेला निकाल भाजपच्या कपाळावर आठ्या निर्माण करणारा आहे. कारण, यावेळी भाजपचे 32 आमदार निवडून आले आहेत. भापजला 38.97 टक्के (985,797) मते मिळाली. 2018 मध्ये भाजपला 36 जागांवर विजय मिळाला होता आणि 43.59 टक्के (10,25,673) मते मिळाली होती. म्हणजेच भाजपने या निवडणुकीत केवळ चार जागा गमावल्या नाहीत, तर मतांची टक्केवारीही घटली. हा तिप्रा मोथा पक्षाचा प्रभाव आहे अशी चर्चा रंगली आहे.
मेघालयात एनपीपीसोबत पाच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर भाजपने या निवडणुकीत युती तोडली आणि एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. भाजपने मेघालयात सर्व 60 जागा लढविल्या होत्या. परंतु, फक्त दोन आमदार निवडून आले. 173,042 मते मिळाली. टक्केवारी सांगायची झाली तर 9.3 अशी आहे. एनपीपीला 26 जागांवर विजय मिळाला आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत एनपीपीच्या पाच जागा जास्त निवडून आल्यात. मतांची टक्केवारीसुद्धा 20.6 टक्क्यांवरून 31.4 टक्क्यांवर पोहोचली आहे.
नागालॅंडमध्येसुद्धा भाजप युतीने 37 जागा मिळवित पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. येथे भाजपचे 12 आमदार निवडून आले आहेत. 215,336 मते मिळाली असून मतांची टक्केवारी 18.81 आहे. गेल्या निवडणुकीतही भाजपला 12 जागांवर यश मिळाले होते आणि 15.3 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे नागालॅंडमध्ये भाजपला 3.51 टक्के वाढली आहेत.
भाजपचा मित्रपक्ष नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सर्वाधिक 25 जागांवर विजय मिळाला असून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. गेल्या निवडणुकीत 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने नागालॅंडचा विजय हा एनडीपीपीचा मानला जात आहे. 2019 मध्ये स्थापन झालेल्या तिप्रा मोथा पक्षाने या निवडणुकीत 19.7 टक्के मते मिळवित 13 जागा जिंकल्या आहेत. हा पक्ष आता मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. ईशान्येकडील राज्यांची जनता कधी सत्तांतर घडवून आणेल काही सांगता येत नाही. येथे कधी मुख्यमंत्री तर कधी अख्खा विरोधी पक्ष बाजू बदलताना दिसतो. यामुळे, ईशान्येकडील जनतेचे मूड लक्षात घेता भाजपने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. म्हणून तिप्रा मोथा या पक्षाचे मन सांभाळावे लागेल.
महत्त्वाचा मुद्दा असा की, भारतीय जनता पक्षाने प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकींमध्येही आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती आणि याचे श्रेयसुद्धा मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार या राज्यांना भेटी देत पक्षाचा जोरदार प्रचार केला. पंतप्रधानांचे “लूक ईस्ट पॉलिसी’ही ईशान्येकडे आहे. याचा अर्थ असा की, ईशान्येकडील राज्यांना भाजप फार महत्त्व देतो. याचे कारण येथील लोकसभेच्या जागा. त्रिपुरा, नागालॅंड आणि मिझोरम या राज्यांत लोकसभेच्या पाच जागा आहेत आणि या निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या झोळीत या पाचही जागा आताच टाकल्या आहेत, असे मानायला हरकत नाही.
पुढच्या वर्षी 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणे आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. भाजप एका-एका जागेवरही शंभर टक्के प्रयत्न करीत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अन्य राज्यांमध्ये सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे याची जाणीव सत्ताधारी पक्षाला आहे. अशात, काही राज्यांत सत्ताविरोधी लाटेमुळे होणारे नुकसान ईशान्येकडील राज्यांतून भरून काढायचे अशी रणनीती भाजपची असल्याचे दिसून येत आहे. भाजपने प्रत्येक निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावली आहे आणि ईशान्येकडील राज्येही यास अपवाद नाही. भाजपने नागालॅंडमध्ये जसा प्रचार यावेळी केला तसा प्रचार यापूर्वी भाजपने कधीही केला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तिन्ही राज्यांमध्ये सत्ताविरोधी लाट असतानाही भाजपने मित्रपक्षांसह पुन्हा सत्तेवर येणे ही खूप मोठी उपलब्धी म्हणायला पाहिजे.
त्रिपुरा, नागालॅंड आणि मिझोरम या तिन्ही राज्यांच्या निकालाची दुसरी बाजूसुद्धा खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे, कॉंग्रेसचे सातत्याने होत चाललेला सफाया. ईशान्येकडील राज्ये म्हणजे कॉंग्रेसचा दशकांनुदशकांपासूनचा बालेकिल्ला. त्रिपुरात काही जागा नक्कीच मिळाल्या आहेत. परंतु, त्या मानसिक समाधानापलीकडे काहीही नाही. गेल्या निवडणुकीत मेघालयमध्ये कॉंग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले. मुळात, कॉंग्रेसने करायला हवे होते तसे प्रयत्न केले नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या निवडणुकीत आणखी एक सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे, नागालॅंडच्या विधानसभेत महिला आमदारांचा प्रवेश होणे. नागालॅंडच्या इतिहासात आजपर्यंत एकही महिला आमदार म्हणून निवडून आली नव्हती. या निवडणुकीत चार महिला निवडणुकीत उभ्या होत्या आणि यापैकी दोन महिला निवडून विधानसभेत पोहोचल्या. दिमापूरमधून हेकानी जाखलू आणि अंगामीमधून सल्हुतुनु क्रुसे या दोन महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची ही सर्वात मोठी भेट होय असं म्हणायला हवे.
नागालॅंडमधून रानो सायजा या 1977 मध्ये सहाव्या लोकसभेत निवडून गेल्या होत्या. त्यांच्यानंतर आता या दोन महिला आमदार झाल्या आहेत. नागालॅंड असे एक राज्य आहे जिथे महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त आहेत. यानंतरही महिलांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. येथील महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर होत्या. आता कुठे राजकारणात प्रवेश मिळाला आहे. थोडक्यात, या निवडणुकीच्या निकालाने विरोधकांसोबतच भाजपलाही सतर्कतेचा इशारा दिला आहे!