दुबई – रोहित शर्मा व लोकेश राहुल यांची आक्रमक अर्धशतकी खेळी व त्याला सूर्यकुमार यादवने दिलेल्या साथीच्या जोरावर भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धीतील सुपर 12 गटातील लढतीत नामिबियाचा 9 गडी राखून सहज पराभव केला.
या सामन्यात विराट कोहली अखेरच्या वेळी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करत होता. या सामन्यातील विजयाने त्याच्या टी-20 संघाच्या नेतृत्वातील सामन्यात भारताने विजय मिळवला व स्पर्धेचा शेवट गोड केला.
गोलंदाजांनी केलेल्या अव्वल कामगिरीच्या जोरावर भारताने नामिबियाला 132 धावांवर रोखले व विजयासाठी आवश्यक धावा 1 गडी गमावून पार केल्या. भारताच्या डावाची सुरुवात लोकेश राहुल व रोहितने धडाक्यात केली. या जोडीने 86 धावांची सलामी दिली.
रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या 56 धावांच्या खेळीत 37 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार फटकावले.
तो बाद झाल्यावर राहुलने सूर्यकुमार यादवच्या साथीत संघाचा विजय साकार केला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. राहुलने 36 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावांची खेळी केली. त्याला साथ देताना सूर्यकुमारने 19 चेंडूत 4 चौकार फटकावताना नाबाद 25 धावा केल्या. नामिबियाकडून जेन फ्रेलिंकने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी,आयसीसीटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धीतील सुपर 12 गटातील लढतीत भारतीय संघातील अव्वल फिरकी रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीसमोर नामिबियाचा डाव 8 बाद 132 धावांवर रोखला गेला.
नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन यांनी 33 धावांची सलामी दिली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने लिंजेनला 14 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला रवींद्र जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जडेजाने सलामीवीर बार्डला 21 धावांवर पायचीत केले. यानंतर जडेजा व अश्विनने नामिबियाला आपल्या फिरकी गोलंदाजीच्या तालावर नाचवले.
यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला अनुभवी फलंदाज डेव्हिड वीसेने एकाकी लढत देताना 26 धावांची खेळी केली. तळात जेन फ्रेलिंकने नाबाद 15 तर, रुबेन ट्रम्पलमनने नाबाद 13 धावा केल्या त्यामुळे त्यांना शतकी धावसंख्या उभारता आली. नामिबियाने 20 षटकात 8 बाद 132 धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी 3 तर, बुमराहने 2 बळी घेतले.