मुंबई: राज्याच्या विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी पाडव्याच्या दिवशी पाऊस झाला आहे. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. भातकापणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रायगडमध्येही उरण, पाली, सुधागड परिसरात पावसाने हजेरी लावली.
कोल्हापूरच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. चंदगड, नेसरी परिसरात झालेल्या पावसाने कापणी केलेल्या भाताचे नुकसान झाले. आठवडी बाजारातही पावसाने तारांबळ उडाली.
नाशिकमध्येही पावसाने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. कॉलेज रोड परिसरात आयोजित केलेला सांजपाडव्याचा कार्यक्रम पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या जरी काही भागात पाऊस दिसत असला तरी पुढील 8 दिवसांनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच थंडीची चाहूल जाणवणार असल्याचे देखील हवामान विभागाकडून आधीच सांगण्यात आले होते.