जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकटं आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं. देवांनी आणि मानवांनी; मग ते महिशासूररूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो तिच्या अनुपम रूपांचे गोडवे नेहमीच गायिले गेले. कधी ती सौम्य रूपात कधी उग्र रूपात पण नेहमीच आपल्या भक्तासांठी ती धावून आलेली आहे. या आदिशक्तीचे पुरुषभक्त महिलांहून अधिक आढळतात. मात्र, नवरात्रीचे नऊ दिवस उपास करून अखंड पूजन करणारे हे पुरुषभक्त इतर वेळी इतर दिवशी स्त्रियांशी वेगळे का वागतात? इथं त्यांची सौहार्दता का दिसून येत नाही. आदिशक्तीचं स्मरण करावं मनोभावानं स्त्रीला आदरानं, किमानपक्षी माणूस म्हणून वागवावं, असा पण करावा.
‘यत्रनार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवता:’ असं म्हणतात. ज्याठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते, ज्याठिकाणी स्त्री ही वंदनीय आहे, जिथे तिच्या मताला किंमत आहे, तिच्या स्वाभिमानाचे रक्षण केले जाते त्या ठिकाणी देवांचे वसतिस्थान असते, त्या ठिकाणी देव रमतात, असा या ओळीचा अर्थ होतो. हे आठवायचे कारण पुन्हा नवरात्रीचे दिवस येतात. दरवर्षी येणाऱ्या आदिशक्तीचे आगमन. मनाला पुन्हा विचार करायला भाग पाडते. या आदिशक्तीचीचं रूपं असणारी आजची स्त्री. कशा प्रकारचं जिणं जगतेयं! आजच्या कलियुगात तिचा योग्य तो मान राखला जातो का? वर वर पाहता समसमानतेच्या युगात जरी समान हक्क दिला गेलेला आहे तरी मनापासून तो ग्राह्य आहे का? अगदी ऐरणीच्या टोकावरचा प्रश्न जरी नसला तरी पुन्हा नव्यानं विचार करणं गरजेचं ठरू पाहतयं, हे नक्की.
देवानं जग निर्माण केलं, पुरुष निर्माण केला, तरीही जगाला पूर्णता आली नाही, काही त्रुटी देवाला जाणवल्या मग त्यानं पुरुषाच्या अर्ध्या अंगापासून स्त्री निर्माण केली. अशी रूपककथा आहे. म्हणूनच तिला अर्धांगी म्हटलं जातं; पण हे अर्धांग पूर्ण आहे. या पूर्णत्वाची जाणीव वेळोवेळी जगाला झालेली आहे, अनुभवाला आलेली आहे असं असताना मग ही आज होणारी वंचना तिच्या वाटेला का यावी? हा अनुभव दर काळात, दर युगात तिच्या वाटेला आलेला आहे. कधी सीता कधी द्रौपदी तर कधी अहल्या. जर स्त्री ही आदिशक्ती मानली जाते तर मग असं का? याची उत्तरं काळात दडलेली आहेत की, पुरुष प्रधान संस्कृतीच्या अंर्तमनात?
अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची सुरुवात होते. याला शारदीय नवरात्र देखील म्हणतात. नवरात्रीचे दिवस मोठे छान असतात. नऊ दिवसांत आदिशक्तीचे 9 रूपात पूजन होते. पहिले 3 दिवस महाकालीपूजन, नंतरचे 3 दिवस महालक्ष्मीपूजन आणि शेवटचे 3 दिवस महासरस्वतीपूजन. पूर्णत: चैतन्यमय दिवस, आल्हादकारक वातावरण आणि निसर्गाचं विलोभनीय सक्रिय समर्पण. सकाळच्या कोवळ्या वेळी सूर्याच्या सोनेरी किरणात उगवलेली पहाट हरी ओम् हिरण्यवर्णाम्… अशा मंगलमय पवित्र स्वरांनी अधिकच पवित्र होते.
घरातून धुपाचा वास, शंखध्वनी वातावरणात भिनू लागतो आणि खऱ्या अर्थानं नवरात्र सुरू होत असल्याची जाणीव होते. ऑफिसला जाताना रस्त्यावर देखील नवरात्र विविध रंगाच्या सुदंर रेशमी साड्यांमधून जाणवत राहतं. माणसाचं मन असच असतं जे आज आहे, जे ताजं ते आपलसं करायचं आणि येणाऱ्या दिवसाचं स्वागत करायचं ही वृत्ती स्त्रीमध्ये तर जास्तच प्रकर्षानं जाणवते. दु:ख सोसण्याची जबरदस्त ताकद तिच्यात आहे. पुरुषानं कितीही नाकारलं, कितीही त्रास दिला तरी तिच्यात पुनश्च ताकदीनं उभी राहण्याची शक्ती आहे.
साधसं उदाहरण, काही दिवसांपूर्वी माझ्या कामवाली बाईंनी सागितलं, घरवाला काही काम करत नाही. नुस्ता पितो आणि घरात दंगा करतो. दोन मुलं. त्यातील मुलगी वयात आलेली. कसं साभांळू? खूप सोसलं पण आता नाही. घराचे दारच आता त्याला बंद. नेहमीचीच कथा आणि आज? तिचं नवरात्रात 9 दिवस उपास करणार, नवऱ्यासोबत जाऊन देवीची ओटी भरणार. “का गं असं’, मी विचारताच ती म्हणते, “जाऊ द्या बाई, आपला जन्म असाच नवऱ्याला माफ करायचं, झालं गेल विसरायचं आणि पुढं चलायचं. तेच तेच धरून का कुठं चालतयं.’ चार वर्गसुद्धा शिकली असेल असं वाटत नाही, पण ही विचार करण्याची तिची ताकद तिच्यात उपजत आहे. सोशिकता हा गुण निसर्गानं तिला जन्मत: दिलेला आहे.
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकटं आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं. देवांनी आणि मानवांनी मग ते महिशासूररूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो. तिच्या अनुपम रूपाचे गोडवे नेहमीच गायिले गेलेले आहे. कधी ती सौम्य रूपात, कधी उग्र रूपात पण नेहमीच आपल्या भक्तासांठी ती धावून आलेली आहे. तिचे स्त्रीभक्तापेक्षा पुरुषभक्त अधिक भाविक आढळतात. नवरात्रीचे नऊ दिवस उपास करून अखंड पूजन करताना इतर वेळी, इतर दिवशी स्त्रियांशी वेगळे का वागतात, त्यांची सौहार्दता का दिसून येत नाही. लहानपणाची एक आठवण दर नवरात्रात मला होते. समोर राहणारे काका नवरात्रात नऊ दिवस उपास करत.
रात्री आरतीच्या वेळी काकूंच्या अंगात देवीचा संचार होई. आरतीला खूप लोक जमत असत. त्यावेळी काका काकूला अगदी वाकून नमस्कार करत, अगदी भक्तिभावानं! आरती संपल्यावर मात्र जेवण वाढायला उशीर झाला की, एवढे मोठ्यानं ओरडत सगळ्या आळीला ऐकू जायचे. शेजारची मथी आजी म्हणायची, “काय मेला हा माणूस आधी मारे फुलांनी पूजा करतो आणि मग…’ मी एकदा असं म्हटलं होत की, “मग काकूंनी नेहमीच देवी म्हणून राहावं.’ “बाई तू राहशील हो तशी! काय सागांव जमाना बदलला…’ पण अजून तरी चित्र बदललं नाहीयं. थोडा बदल आहे, नाही असं नाही. समसमान विचारांचा पगडा नवीन पिढीत जाणवतोय. मुलंमुली बरोबरीनं शिकतात, पण तो पूर्ण समाधानकारक नाही.
वास्तविक पुरुषप्रकृती, एकाच रथाची दोन चाकं, वाचून देऊन गुळगुळीत झालेल्या उपमा. सवयीनं त्याच त्या ओठावर येतात. परुष श्रेष्ठ की स्त्री! कशासाठी वाद घालायचा. केवळ रोजच्या जीवनात नाही, तर पूजेच्या अगदी नवरात्रीत देवीच्या पूजेच्या वेळी दोघांची सारखी गरज असते तेव्हा हा वाद आता नको. सुंदर दिवस आहेत. मनात आदिशक्तीचं स्मरण करावं. मनोभावानं तिला नमन करावं. जमल्यास पुढच्या संपूर्ण जीवनात स्त्रीला आदरानं, किमानपक्षी माणूस म्हणून वागवांव, असा पण करावा. हा आदेश नाही आग्रह आहे.
अरुणा सरनाईक