दिल्ली ते जयपूर दरम्यान दोनशे किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
नवी दिल्ली : भारतात प्रथमच एका मोठ्या ई हायवेची उभारणी करण्याचे नियोजन असून देशाची राजधानी नवी दिल्ली ते राजस्थानची राजधानी जयपूर यादरम्यान दोनशे किलोमीटर लांबीचा हा ई हायवे उभारण्यात येणार आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे एक पहिले पाऊल मानण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नुकतेच आपल्या राजस्थानच्या दौऱ्यामध्ये या हायवेच्या योजनेची घोषणा केली. या हायवेवर फक्त इलेक्ट्रिक वाहने चालवण्याची परवानगी असणार आहे. कारण या हायवेला संपूर्णपणे विद्युत कनेक्शन असणार असून या विद्युत कनेक्शन च्या माध्यमातूनच ही वाहने चालणार आहेत. ज्याप्रकारे विद्युत शक्तीवर ट्रेनचे काम चालते त्याच प्रकारे या हायवेवर वाहने चालविण्याचे काम केले जाईल.
या इलेक्ट्रिक हायवेवर ठराविक अंतरानंतर वाहनांच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. दिल्ली मुंबई या एक्सप्रेस वेवरच एका नव्या लेनमध्ये या हायवेची उभारणी करण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार सध्या स्वीडनमधील काही कंपन्यांशी प्राथमिक चर्चा करत आहे.
सरकारने 2016 मध्ये प्रथम या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर 2019 च्या अर्थसंकल्पामध्ये इलेक्ट्रिक हायवेसाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर नितीन गडकरी यांनी देशातला पहिला ई हायवे नवी दिल्ली ते जयपूर या दरम्यान उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे.