आता अंधार फार झाला आहे. स्त्रीला देवी मानण्याचा नवरात्राचा सण लवकरच सुरू होईल, पण स्त्रियांवरील अत्याचारांमुळे महाराष्ट्राच्या सुधारक, सुसंस्कृत प्रतिमेला कलंक लागतो आहे आणि म्हणूनच “अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’ असे म्हणावेसे वाटते.
गेले काही दिवस आपण सर्वजण सणासुदीचा आनंद घेत असताना काही स्त्रियांना मात्र भयानक अत्याचारांना तोंड द्यावे लागत असून त्या दुःखाच्या, अन्यायाच्या अंधारात ढकलल्या जात आहेत. दहा सप्टेंबर रोजी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशीच मुंबईत साकिनाका येथे बलात्कार करून एका स्त्रीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.
मुंबईत दिवसाला दोन तर देशभरात दिवसाला 88 बलात्कार होतात. पुण्यामधे रेल्वेस्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. दिल्ली, हाथरस, बुलंदशहर, उन्नाव, राजस्थान, गोरखपूर, चेन्नई… देशभरात हीच स्थिती आहे. आपला समाज, आपली सभ्यता आणि संस्कृती किती खालावली आहे, हे यावरून दिसून येते.
ज्यांनी बलात्कार केला अशांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या मुलाखती घेऊन मध्यंतरी एक सर्व्हे केला गेला, तेव्हा असं लक्षात आलं की, पुरुष म्हणून आपल्याला काही खास विशेषाधिकार जन्मतःच प्राप्त झालेले आहेत, असं त्यांनी गृहीत धरलेलं होतं. समाजातील मुली किंवा स्त्रिया त्यांच्या सेवेसाठीच असतात; स्त्रियांनी त्यास नकार दिला तर त्याचा राग, सूड म्हणून पुरुष त्यांच्यावर बिनधास्त जबरदस्ती करू शकतात; अशी त्यांची ठाम समजूत होती. घरातच जेव्हा हिंसेचा धडा मिळतो, तेव्हा मुली आणि स्त्रियांवर हिंसा करणं हा पुरुषांचा अधिकारच आहे, असं मुलं समजू लागतात हेही दिसून आलं.
“शक्ती’ नावाचा कायदा स्त्रियांसाठी करण्यात येणार आहे. अर्थात कायद्यांची संख्या वाढवून असले प्रश्न सुटत नाहीत. गुन्हा करणारा परिणामांचा विचार करून अपकृत्य करतो हा समजच मुळात चुकीचा आहे. बलात्कार केल्यास कायद्याने ताबडतोब शिक्षा होऊन तुरुंगात रवानगी होईल किंवा फाशी होईल हा धाक गुन्हेगाराला वाटला तर कदाचित तो ते कृत्य करण्यास धजावणार नाही असे वाटते खरे; पण हा नुसताच आशावाद झाला. सध्या महिलांशी संबंधित 98 टक्के खटले न्यायालयात प्रलंबित आहेत; तर न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ पंधरा टक्के आहे.
समाजातील गुन्ह्यांची ही लाजीरवाणी मालिका आपल्याला खरोखरच थांबवायची असेल तर त्याची सुरुवात मुलगा आणि मुलगी यातील भेदाभेद संपवण्यापासून व्हायला हवी. कारण घरात, नोकरीत, रस्त्यात, व्यवसायात, समारंभांमध्ये, शाळा-कॉलेजात, कलाक्षेत्रात… कुठेही मुली व स्त्रियांचा आदर ठेवला गेला नाही, स्त्री व पुरुष दोघांना बरोबरीने वागवले गेले नाही, तर त्याचे पर्यवसान अशा हिंसेमधे होणे अटळ आहे. चित्रपटात मुलीची इच्छा नसताना टोळक्यानी तिची छेड काढणं, अंगविक्षेप करून कुत्सित गाणी म्हणणं हे पाहून तीच गोष्ट प्रत्यक्षात करण्यास मुले का कचरतील?
“पिंक’ सारख्या एखाद्याच चित्रपटातून असं स्पष्टपणे दाखवलं जातं की, मुलीला नकार देण्याचा हक्क आहे आणि त्याचा दुसऱ्या व्यक्तीनं आदर करायलाच हवा. मुली “नाही, नको’ म्हणाल्या, तरी पुरुषांनी तिकडे दुर्लक्ष करायचं असतं, हा समज चुकीचा आहे, पण असा संस्कार पिढ्यान्पिढ्या पुरुषांवर होत आलेला आहे. टीव्ही सीरिअलमधेही उच्चशिक्षित महिला आगाऊ, दुसऱ्याचा संसार मोडणाऱ्या असतात तर सवतीला हरताळकेची पूजा शिकवणाऱ्या, केवळ घरसंसार सांभाळणाऱ्या बायका शालीन, सुस्वभावी दाखवल्या जातात. अर्थातच जाहिराती, चित्रपट, व्हॉट्सऍपवरचे मेसेजेस, सीरिअल्स, सामाजिक चालिरीती या साऱ्या माध्यमांतून बाईची बरोबरी पुरुषाशी होऊ शकत नाही, तिचा जन्मच पुरुषांसाठी आहे; हे वारंवार सगळ्यांच्याच मनावर बिंबवलं जातं.
अनेक चित्रपटांमधे बलात्कार होताना दाखवला जातो. त्याचे स्वरूपही असेच लबाडीचे असते. म्हणजे बाईवर होणारा अत्याचार पाहताना पुरुषाबद्दल संताप, चीड येण्याऐवजी ते दृश्य मनोरंजक पद्धतीने दाखवले जाते. अशा वेळी पुरुष गुन्हेगार न वाटता त्याच्यात वीरत्वाचा अविर्भावच जास्त दिसतो. हे सारे सतत पाहून ऐकून स्त्रीबद्दलची तुच्छता वाढतच जाते. मुंबईतील साकिनाका भागात जो बलात्कार झाला, तो याच स्वरूपाचा होता.
बलात्कार करणारा पुरुष व ती स्त्री यांच्यामधे काही आर्थिक व्यवहार झाले होते. त्याबद्दल त्यांचे मतभेद होते. त्याला राग आला. फारच राग आला. तो तिच्यावर कसा काढायचा? काय केल्यामुळे तिचा सगळ्यात जास्त मानभंग होईल? कशामुळे ती खचून जाईल? कशामुळे तिला सगळ्यात जास्त वेदना होतील? तर बलात्कार केल्यामुळे. बाईला अद्दल घडवण्यासाठी, तिला जास्तीत जास्त मनस्ताप देण्यासाठी बलात्कार हे शस्त्र पुरुष वापरतो.
हे शस्त्र त्याच्या हाती कोणी दिलं? … तर आपणच! जिच्यावर बलात्कार होतो, तिलाच आपण दोषी ठरवण्यात धन्यता मानली. तिला बदनाम केलं. तिच्या कुटुंबीयांशी सहानुभूतीनं वागलं, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर मुलींना धीर वाटेल. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करायला हवेत. बलात्कार किंवा विनयभंग करणाऱ्या पुरुषाला समाजात डोकं वर काढणं अशक्य होईल, तेव्हाच ह्या गुन्ह्याला आळा बसेल. म्हणून सुसंस्कृत समाजाला लांच्छनास्पद असणारा हा गुन्हा आपल्याला टाळायचा असेल तर कायद्याबरोबरच समाजामधे स्त्रीबद्दल बरोबरीची, आदराची भावना निर्माण करणं हा उपाय दीर्घकालीन असला तरी तोच जास्त उपयुक्त ठरेल.
माधुरी तळवलकर