मुंबई – परमवीर सिंग यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दर्शविला आहे. परमवीर सिंग यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे परमवीर यांनी योग्य त्या केंद्रीय प्रशासकीय लवादापुढे (कॅट) जाऊन दाद मागावी. तसेच लवादाने हायकोर्टाच्या कुठल्याही निर्देशांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्र सुनावणी घेत यावर निर्णय द्यावा, असे निर्देश दिले आहेत.
या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्याच्या होमगार्ड विभागाचे प्रमुख परमवीर सिंग यांच्यावर पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे.
तसेच पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी एका प्रकरणात निलंबन रद्द करण्यासाठी परमवीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. याची दखल घेत राज्य सरकारने परमवीर यांची एसीबीमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, ही चौकशी टाळण्यासाठी परमवीर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने 26 जुलै रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.