नवी दिल्ली : राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे आपण सर्वच पाहात आहोत. त्यामुळे नियम पाळले पाहिजेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. करोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झाला आहे. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा कडक इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. “करोना संपल्याच्या अविर्भावात अनेकजण वावरत आहेत. हे काही योग्य नाही. हे थांबायला हवं. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ लोकांनी सरकारवर आणू नये”, असेही अजित पवार म्हणाले.
“काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितले आहे की खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत”, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्य सहकारी बँकेवर ईडीने छापेमारी केल्याचे वृत्त सोशल मीडियात व्हायरल झाले . मात्र अशी कुठलीही घटना घडलेली नाही. या धादांद खोट्या बातम्या आहेत. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास आता उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.
“मी ४० वर्ष राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जाता हे दुर्दैवी आहे. काही लोकांमुळे सहकारी खातं बदनाम होतंय”, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.