– प्रा. किशोर सस्ते
सह्याद्रीच्या कुशीतील भूपादप वनस्पतींचे रूप, रंग, गंध येथे उलगडला आहे…
मुसळ्या, कुळया, चायत्या ।
ऊगवून आल्या पावसात आयत्या ।।
सापकांदे, खरचुड्या अन् सुरणे ।
हिरवीगार फसवी सगळी रानकुरणे ।।
पावसाची चाहूल लागली की रानावनात हळूच फुलणाऱ्या वनस्पती म्हणजे भूपादप वनस्पती. या सर्व अल्पजीवी गटात मोडतात. कारण जीवनचक्राचा कालावधी खूप लहान असतो. या वनस्पती अगदी उन्हाळ्यापासून फुलायला सुरुवात होते. या वनस्पतींमध्ये बहुतांश शाक वनस्पती असतात. बहुतांश भूपादप वनस्पती उदाहरणार्थ,
दीपकडी, कुळई, रानहळद व सुरण जून ते ऑगस्ट या काळात फुलत असल्या तरी कात्रज, लोणावळा व पाचगणीसारख्या ठिकाणी येणाऱ्या वनस्पती मे महिन्यात अतिशय उष्ण अंश तापमानाला फुलतात हे विशेष. आधी नुसतीच पानाविना फुले व पाऊस पडल्यावर पाने येतात. नंतर या वनस्पती सुप्त अवस्थेत जातात. तर काही वनस्पतींमध्ये आधी पाने नंतर फुले येतात.
भूपादप वनस्पतींमध्ये कांदे, सुरण, कंद व बटाटे असे अवयव असतात. हे अवयव अन्नसाठा करून ठेवतात म्हणूनच भूपादप वनस्पतीमध्ये अवर्षण वातावरणाला सहन करण्याची क्षमता असते. सुमात्रा सारख्या देशात फुलणाऱ्या अळू वर्गीय अमोपरफोफालस टिटानम ह्या भूपादप वनस्पतीचा पुष्पसंभार हा जगातील सर्वात मोठा आहे. दीपकाडी ह्या वनस्पतीचे नाव तुर्किश नावावरून म्हणजे सुगंधित फुलांचा पुष्पसंभार यावरून पडले आहे.
काही दिवसांचे आयुष्य असलेल्या या वनस्पतीवर काही मिलिमीटर ते काही सेंटिमीटर आकाराची फुले येतात. आपल्या रंगाने, विविध आकाराच्या आणि गंधांच्या नकला करून परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करतात तर कधी ते कीटकांपासून संरक्षण करतात. उदाहरणार्थ, सापकांदा ह्या वनस्पतीवर छोटे जांभळ्या काळ्या रंगाचे ठिपके असतात, पान खाणाऱ्या कीटकांना हे ठिपके भोक पडल्यासारखे दिसतात व आपण ह्या झाडाचे पान खाल्ले आहे, असे भासवून वनस्पतीं आपले संरक्षण करतात.
आर्किडमधल्या हाबेनारियामध्ये पांढऱ्या फुलांचा आकार बाहुलीसारखा किंवा परीसारखा असतो त्यास आषाढ अमरी असे म्हणतात. तर धबधब्याच्या पाणथळ जागेत येणारा पानतेरडा हा गुलाबी रंगाच्या परीसारखा दिसतो. खंडाळ्याची राणीमध्ये फुले वाघ आपला जबडा मोठा करून त्यावरच्या पांढरा शुभ्र रंग असणाऱ्या मिशा वाघाच्या तोंडाची हुबेहूब नक्कल करतात म्हणून त्यास “वाघचौरा’ म्हणतात. ब्रिटिश काळात ह्याची फुले खंडाळ्यात त्याचा एक पुष्प गुच्छ 150 ते 200 रुपये याप्रमाणे विकला जायचा.
त्यातच ही खंडाळ्याची राणी दिसेनाशी झाली व सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हबेनारीया लॉंगी कॉरनिक्युलॅटा ही वनस्पती म्हणजे गुढीपाडव्याच्या गुढीच. अरेसिमा ह्या वनस्पतींमध्ये नागोबाने फणा काढून जीभ बाहेर काढली आहे असे दिसते. तर काही ऑर्किडची फुले मोर आपला पिसारा बसवून बसला आहे, असं दिसतं.
काही वनस्पतीमध्ये पूर्ण जीवनचक्रामध्ये फक्त एक पान येते. ज्या भूपादप वनस्पतींमध्ये जमिनीला समांतर पाने वाढतात, त्या वनस्पतींमध्ये मुळाभावती बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय थांबतो. काही वनस्पतींमध्ये ही पाने पाणी साठवणाऱ्या छत्रीसारखे काम करतात व अवतीभवती ओलसर वातावरण झाडाच्या वाढीस तयार करतात. काहींच्या मते, असे पानाखाली तयार झालेले ओलसर वातावरण सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेत वाढ करतात व यामुळे कार्बन डायऑक्साइडयुक्त वातावरण तयार होते.
प्रकाशसंश्लेषणादरम्यान घेतल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढविते. काही गवताळ प्रदेशांमध्ये वाढणाऱ्या भूपादप वनस्पतीला गवतासारखी पाने असतात. त्यामुळे त्यांचे गवत खाणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण होते. काही प्रदेश निष्ट वनस्पतींमध्ये ड्रिमीया राझी ही वनस्पती जगात फक्त दिवे घाटात आढळते. महाबळेश्वर, पाचगणी या भागात कर्णफुले तसेच पॅनक्रॅशियम सेंटिमेरी ही वनस्पती फक्त खंडाळ्यात येते.
कुळई, चाईत, मोगरी कांदा किंवा शेवाळ या रानभाज्या म्हणून खाल्ल्या जातात. कापूरसारखा वास येणाऱ्या माईनमुळ्याचे लोणचे बनवतात. पंद गाजरास अगदी आपल्या गाजरासारखा सुगंध येतो. या वनस्पती औषधी तर आहेत. कंदीलफूल किंवा अग्नीशिखा ही वनस्पती रंगीबेरंगी ज्वालासारखे लाल-पिवळ्या रंगाची उधळण करते. गुलछडीच्या कुळातील पॅनक्रॅशियम 2 सेंटिमीटर ते 20 सेंटिमीटर लांब टपोरे फुले असणाऱ्या फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या शुभ्र स्फटिकांसारख्या चमकतात.
आपल्याकडे बागेत शोभिवंत वनस्पती म्हणून उपयोगात आणल्या जाऊ शकतात. या वनस्पतींचे फुलांचे सौंदर्य, त्यांचे औषधी उपयोग, त्यांचा खाद्य आणि त्यांचा गौरीगणपतीसारख्या सणावारांमध्ये पत्री म्हणून वापर केल्यामुळे या नामशेष होत आहेत. मागील काही दशकांत या वनस्पतींचा अधिवास खाणकाम, पवनचक्की, रस्तेबांधणी व औद्योगिकीकरण यामुळे धोक्यात आला आहे.