भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पाच टप्पे आत्तापर्यंत पार पडले असून आणखीन दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल. 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. मतदारांनी यावेळी कोणाला कौल दिला आहे याची माहिती प्रत्यक्ष मतमोजणीनंतर समोर येणार असली, तरी आताच देशात 4 जूननंतर काय होईल याबाबत चर्चा रंगू लागली आहे. त्यातच राजकीय विश्लेषक आणि रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400चे उद्दिष्ट गाठू शकणार नसली, तरी नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होतील असे भाकीत केल्यानंतर या चर्चेला अधिकच वेग आला आहे. अर्थात, प्रत्येक जण आपापल्या पातळीवर आणि आपापल्या भूमिकेप्रमाणे देशात 4 जूननंतर काय होईल याबाबत भाकिते करत आहे. लोकसभा निवडणुकीतील आणखी दोन टप्पे बाकी असल्यामुळे हे टप्पे पूर्ण होईपर्यंत सर्वच राजकीय पक्षांना आपली राजकीय भूमिका कायम ठेवावी लागणार आहे. साहजिकच भाजप आणि मित्रपक्ष 400 पारचे टार्गेट पूर्ण करतील असा विश्वास एनडीएचे नेते व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे, आम्हीच सत्तेवर येऊ असा दावा इंडिया आघाडीचे नेतेही करत आहेत. निवडणुकीच्या आरंभीच्या टप्प्यामध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काहीसा आळशीपणा दाखवल्यामुळे त्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसू शकतो, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये कधी भाजपचे तर कधी विरोधी पक्षांचे रणनीतिकार म्हणून काम करत असलेल्या प्रशांत किशोर यांचे अंदाज आजपर्यंत फारसे चुकलेले नाहीत. तरीही 4 जूननंतर नक्की काय होईल आणि मतदारांनीच काय ठरवले आहे हे समजणार आहे. या पूर्वीही भारतासारख्या मोठ्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्तांतरे झाली आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी जेव्हा आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली तेव्हा ‘इंडिया शायनिंग’ या नावाची मोहीम राबवण्यात आली होती.
पण त्यानंतरच सत्तांतर झाले आणि तब्बल 10 वर्षे पुन्हा काँग्रेस आघाडीच्या हातात सत्ता गेली होती, असा राजकीय इतिहास सांगतो. देशात दीर्घकाळ सत्तेवर असणार्या काँग्रेस पक्षालासुद्धा अनेक वेळा मतदारांचा अंदाज न आल्यामुळे सत्तांतराचा सामना करावा लागला आहे. साहजिकच यावेळी सत्ताधारी आघाडी 400 पेक्षा जास्त जागा मिळवेल की नाही हीच उत्सुकता आहे. अर्थात, 545 जागा असलेल्या लोकसभेमध्ये 280च्या आसपास जागा मिळवलेली आघाडी किंवा पक्ष सत्तेवर येऊ शकत असल्यामुळे 280 पेक्षा कितीही जास्त आणि 400 पेक्षा कितीही कमी जागा मिळाल्या तरी भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकतो याची जाणीव 400च्या घोषणा देणार्या सत्ताधार्यांनाही आहे. प्रशांत किशोर यांनी तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसर्या कार्यकाळामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात याचीही काही गणितं मांडली आहेत. मोदी यांच्या तिसर्या कार्यकाळामध्ये पेट्रोलियम उत्पादने जीएसटीमध्ये येतील आणि पेट्रोलियम पदार्थ स्वस्त होतील अशी शक्यता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे 4 जून नंतरच्या मतमोजणीनंतर नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारचा रोड मॅप काय असेल याबाबतच्या सूचनाही नरेंद्र मोदी यांनी आधीच अधिकार्यांना देऊन ठेवल्याच्याही बातम्या येत आहेत. पुढील शंभर दिवसांमध्ये कशा प्रकारचे काम करायचे आहे याबाबत काही मार्गदर्शक सूचना नोकरशाहीला देण्यात आल्या आहेत. अर्थात, राज्यकर्त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे एवढेच काम नोकरशहांकडे असल्यामुळे ही नोकरशाहीसुद्धा 4 जूननंतर काय होते यावर लक्ष ठेवून असणार आहे. मतमोजणीनंतर निर्माण होणार्या परिस्थितीबाबत विविध राजकीय पक्षांचे नेते विविध प्रकारची मते व्यक्त करत असली तरी वास्तवाला धरून ही मते आहेत का याचा विचार सर्वांनाच करावा लागणार आहे.
4 जूननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोळी घेऊन जावे लागेल हे विरोधी नेत्यांचे वाक्य व्यासपीठ गाजवण्यासाठी आणि टाळ्या मिळवण्यासाठी ठीक असले तरी किंवा नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत असताना काँग्रेसला राहुल गांधी यांच्या वयापेक्षाही कमी जागा मिळतील अशी टीका करणे हासुद्धा एक विनोदाचा भाग असला तरी देशातील मतदारांनी नक्की काय निश्चित केले आहे हे 4 जून नंतरच समजणार आहे.
अर्थात, 1 जून रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या नेहमीप्रमाणे एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करतीलच. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच्या कालावधीमध्ये जे ओपिनियन पोल घेण्यात आले होते त्यामध्ये विविध वृत्तवाहिन्यांचे विविध प्रकारचे निष्कर्ष होते आणि एक्झिट पोलमध्येसुद्धा असे विविध आणि विरोधीभासी निष्कर्ष आतापर्यंत समोर आले आहेत. मतदानाला जाण्यापूर्वी किंवा मतदान करून आल्यानंतर मतदार सर्व्हे करणार्यांना त्या मतदानाविषयी खरी माहिती देईलच अशी कोणतीही खात्री देता येत नाही. पण ओपिनियन पोल असो किंवा एक्झिट पोल असो त्यानिमित्ताने मतदारांनी दिलेल्या कौलाचे साधारण चित्र मात्र निश्चितपणे समोर येते.
ज्याप्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील शेअर मार्केट सकारात्मक दिशा दाखवत आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचेही आशादायक चित्र समोर येऊ लागले आहे ते पाहता आर्थिक क्षेत्रालासुद्धा 4 जूनच्या मतमोजणीची उत्सुकता आहे, असेच दिसते. देशातील विविध राजकीय तज्ज्ञांच्या मते, यावेळची लोकसभा निवडणूक नॉर्मल पद्धतीने लढली गेली म्हणजे यावेळी कोणतीही लाट अस्तित्वात नव्हती. अशावेळी मतदारांनी निश्चित कोणाला कौल दिला आहे याचा अंदाज बांधणे अवघड असते. म्हणूनच मतमोजणीला आणखी दहा-बारा दिवसांचा कालावधी बाकी असतानाही मतमोजणीची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेला कितीही विविध रंग आले तरी मतदारांच्या अंतरंगात काय आहे हे मात्र 4 जूननंतरच समजणार आहे.