नवी दिल्ली- राजस्थान, पंजाबपाठोपाठ छत्तिसगढ या तिसऱ्या कॉंग्रेसशासित राज्यात सत्तासंघर्ष चिघळल्याचे चित्र आहे. त्यातून थेट कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पॅच-अपसाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.
छत्तिसगढमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातून विद्यमान मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि त्या राज्याचे आरोग्य मंत्री टी.एस.सिंगदेव यांच्यातील मतभेद वाढीस लागले आहेत. कॉंग्रेसने 2018 मधील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून छत्तिसगढची सत्ता हस्तगत केली.
त्यावेळी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांच्या कालावधीसाठी विभागून देण्याचा निर्णय कॉंग्रेस नेतृत्वाने घेतल्याचा दावा सिंगदेव यांच्याकडून केला जात आहे. त्यावरून छत्तिसगढ कॉंग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. त्या सत्ताकलहाची दखल घेऊन राहुल यांनी मंगळवारी बघेल आणि सिंगदेव यांच्या दिल्लीत स्वतंत्र बैठका घेतल्या.
दोन्ही नेत्यांमधील मतभेद दूर करण्याच्या उद्देशातून राहुल यांनी हस्तक्षेप केल्याचे समजते. मागील काही दिवसांपासून छत्तिसगढ मुख्यमंत्रिपदावरून कॉंग्रेसमध्ये पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र, बघेल आणि सिंगदेव यांनी कॉंग्रेस नेतृत्वाचा निर्णय मान्य करण्याची भूमिका सुरूवातीपासून घेतली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार याविषयीही मोठी उत्सुकता आहे.