श्रीनगर – पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त आज जम्मू काश्मीर मधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाईचे आदान प्रदान केले. चिलेहाना तिथवाल येथील दोन्ही देशांच्या सीमा क्रॉसिंग पॉईन्टवर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी जवानांना मिठाई सादर केली. आणि पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या.
दोन्ही देशांमध्ये सलोख्याचे संबंध राहावेत म्हणून भारतीय लष्करातर्फे दरवर्षीच पाकिस्तानी सैन्याला मिठाई दिली जाते आणि पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतीय जवानांना मिठाई प्रदान केली जाते.
सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय जवानांकडून केल्या जाणाऱ्या या सदभावनेच्या कृतीचे सीमावर्ती भागातील जनतेकडून नेहमीच स्वागत केले गेले आहे. दोन्ही देशांतील सीमा भागात सतत चकमकी घडत असतात पण अलिकडेच दोन्हीं देशांनी सीमा भागात शांतता पाळण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे या भागातील चकमकींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.