लंडन – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या भवितव्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. संघव्यवस्थापन, कर्णधार विराट कोहली व संघातील खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा इंग्लंडमध्ये दाखल झाले असून येत्या दोन दिवसांत हा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतरच खरेतर शास्त्री यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी सुरू झाली होती. त्याचवेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकाही खेळणार होता.
तर दुसरीकडे भारताचा दुसरा संघ श्रीलंकेत राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली मर्यादित षटकांची मालिका खेळत होता. ही मालिका द्रविडसाठी शास्त्रींची जागा घेण्याच्या दृष्टीने लिटमस टेस्ट मानली जात होती. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी असलेल्या द्रविड यांची मुदतही संपत असल्याने द्रविड यांनाच शास्त्रींच्या जागी नियुक्त केले जाण्याच्या चर्चेने जोर धरला.
याचबाबत बीसीसीआयकडे खुद्द शास्त्री यांनीच आपला करार आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंतच असून त्यात वाढ करण्यात येऊ नये, असे सांगितल्यामुळे द्रविडच्या डोक्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा भार ठेवला जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता गांगुली व शहा हे काय चर्चा करणार व त्याचे काय फलित होणार हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
संमिश्र यश
भारतीय संघ आयसीसीची एकही स्पर्धा शास्त्रींच्या प्रशिक्षणात जिंकू शकला नसला तरीही संघाने परदेशात कामगिरी चमकदार केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत दोन वेळा कसोटी मालिकेत पराभूत केले. तसेच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्येही देदीप्यमान यशही मिळवले. तसेच भारतात आलेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्धच्या मालिकाही जिंकल्या. त्यामुळेच त्यांनी संमिश्र यश मिळवले आहे. अर्थात, त्यावर बीसीसीआय किती गांभीर्य दाखवणार हादेखील प्रश्न आहे.