Ravi Shastri on Hardik Pandya captaincy – हार्दिक पंडय़ाला कर्णधार करून मुंबई इंडियन्सने चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. कर्णधारपदाचा निर्णय घेण्यापूर्वी संघाने संवादात स्पष्टता राखली असती, तर हा वाद टाळता आला असता, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले आहे.
चाहत्यांना कर्णधारपदातील बदल पचनी पडलेला नाही. या वादात पंडय़ाने शांत राहावे. दमदार कामगिरी दाखवून वादळाचा सामना करावा. हा भारतीय संघ नाही. यामध्ये संघ मालकाने खेळाडूंना सर्वाधिक पैसे दिले आहेत. त्यामुळे कर्णधार कोण असावा हा त्यांचा अधिकार आहे. पण, तरी हे प्रकरण त्यांना अधिक चांगले हाताळता आले असते. यासाठी त्यांनी संवादात स्पष्टता ठेवणे गरजेचे होते, असे रवी शास्त्री म्हणाले.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात आतापर्यंत मुंबई इंडियन्स (MI) संघासाठी काहीही बरोबर झालेले नाही. मुंबईने पहिले तीन सामने गमावले आहेत. म्हणजेच संघाला विजयाचे खातेही उघडता आलेले नाही. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 7 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.