ना ना बांधोनिया डोळे । घ्राणी लाविजती मुक्ताफळे । तरी तयांचे काय कळे । मोल मान?।।395।। तैसा चित्ती अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्राचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे माते।।396।। (अध्याय 15 वा)
भगवंताच्या प्राप्तीकरिता साधना व्यवस्थित चालू असतानासुद्धा भगवंताचे दर्शन लवकर का होत नाही, असे बऱ्याच साधकांना वाटते.
बऱ्याचजणांना साधनेत अनेक चांगले अनुभव आल्यानंतर पुढे काय करावे हे कळत नाही. या प्रश्नांचे उत्तर सांगणाऱ्या या ओव्या आहेत.
गीतेतील पंधराव्या अध्यायामधील अकराव्या श्लोकावर केलेल्या निरुपणात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, “ज्याप्रमाणे डोळे घट्ट बांधून घेऊन वासाद्वारे आपण मोत्यांचे खरे मूल्य कधीही ठरवू शकत नाही, त्याचप्रमाणे जिव्हेवर सगळी शास्त्रे नांदत असली तरी मनात थोडासुद्धा अहंकार असेल तर अनेक कोटी जन्म गेले तरी मला (म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या खऱ्या स्वरूपाला) जाणता येणार नाही.