महाड: मागच्या आठवड्यात कोकणात मुसळधार पावसामुळे तळिये गावावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. डोंगराने अख्ख गाव गिळले. या दुर्दैवी घटनेत गावातील ३५ घरे दबली गेली. या घटनेत मातीखाली दबलेले अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र आता गावातील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले आहे.
दरडीखाली दबलेले ४९ जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन आतापर्यंत ८५ मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही ३६ नागरिक बेपत्ता आहेत. तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. “तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा”, अशी मागणी या नागरिकांनी केली. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत ८५ जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले होते. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात होते. सायंकाळी चौधरी बचावकार्य सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मृतदेहांची अवहेलना पाहवत नाही, ढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय मिळत आहेत, त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.