म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाही पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।। ओवी 203: अध्याय 4 ।।
श्री ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायात ओवी क्र. 202 ते 205 यामध्ये माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे जन्मांधाला रात्र आणि दिवस यातील फरक कळू शकत नाही त्याचप्रमाणे संशयग्रस्त मनात स्थिरता येऊ शकत नाही.
म्हणून संशय जिथे आहे तिथे भगवंत येऊच शकत नाही (कारण भगवंत अचल, स्थिर आहे) आणि जीवनात भगवंतापासून दूर राहणे हेच एक पाप असल्याने संशयाहून थोर असे पाप नाहीच. त्यामुळे संशय हे सर्व प्राणिमात्रांना संसारात गुतवून ठेवणारे एक भयानक जाळेच आहे.
म्हणून अर्जुना, तू संशयाला टाकून दे. संशय मनात येण्याचे कारण ज्ञानाचा अभाव हेच आहे. जेवढे अज्ञान वाढते तेवढे या संशयाचे प्रमाण वाढते आणि संशय आपल्या मनात आहे हे जाणण्याचे लक्षण म्हणजे मनातील विश्वास निघून जाणे होय.