मुंबई – माझ्या मनात कोणतीही आपत्ती नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अशा निर्णयातून मी गेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असते. नाराजी असते. हे नाकारता येत नाही. पण माझ्या आणि कुटुंबाच्या मनात नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.
प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांनी अखेर पूर्ण विराम दिला. पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्हाला मंत्रिपद मिळाले नाही. म्हणून नाराज होण्याचे कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही.
माझं घर वाहून गेले नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाही. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन केले जाते. पुनर्वसन शब्द मला मान्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. ओबीसींचे आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. तो ओबीसींवर घोर अन्याय होईल. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका केली होती.
ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सरकारने तात्काळ पावले उचलून हे थांबवणे आवश्यक आहे. या पोटनिवडणुका आहेत. मुख्य निवडणुकांच्या आधी तरी सरकारचा इम्पिरीकल डेटा आणि त्याचा अभ्यास होणं हे शंभर टक्के अपेक्षित आहे, असे पंकजा म्हणाल्या.