मुंबई – शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढवणारा आरोप केला आहे. राज्यसभेचे सदस्य भागवत कराड यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संपवण्याचा तो डाव आहे, असा निष्कर्ष शिवसेनेने काढला आहे.
पंकजा यांच्या खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, तसे घडले नाही. त्याचा संदर्भ घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकातील अग्रलेखात टिप्पणी करण्यात आली आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत कराड वाढले. प्रीतम यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा यांना धडा शिकवण्यासाठी ते केले गेल्याची शंका घ्यायला जागा आहे, असे राजकीय निरीक्षण नोंदवून भाजपला डिवचण्यात आले आहे.
कपिल पाटील आणि भारती पवार यांनाही राज्यमंत्री बनवण्यात आले. महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच तो प्रकार आहे. पाटील आणि पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि मंत्रीही झाले, याकडेही अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले आहे.