मुंबई | केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यांना महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचा विरोध आहे. हा विरोध कालही होता, आज आणि उद्याही कायम राहील. विधानसभेमध्ये या कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव पारित करण्याचे काम सरकारकडून होणार आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या कायद्यांबाबत खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारला कोणताही सल्ला दिलेला नाही. मात्र काही माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्यात आली. तीनही कृषी कायदे रद्द व्हावेत, ही पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले.
तसेच या कृषी कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारतर्फे समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करुन शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करेल. अभ्यासाअंती आपला अहवाल सरकारला देईल. या अहवालातील मसुदा शेतकऱ्यांना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी पत्रकारांना केंद्र सरकारमधील हालचालींची माहिती दिली होती. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले म्हणजे तिन्ही कृषी कायद्याबाबत शरद पवार यांनी सल्ला दिला असा होत नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
आमच्या सरकारचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुरुवातीपासून आजपर्यंत तीनही कृषी कायद्याला कायम विरोध राहिलेला आहे. हे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले.